मसूर : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेकदा साथीचे आजार पसरल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेकजण साथीचे बळी ठरत असतात; मात्र कऱ्हाड तालुक्यातील उत्तरेकडील टोकावर असलेल्या पाडळी गावाने सलग पाच वर्षे पाणीपुरवठ्यासाठीचे हिरवे कार्ड मिळवले आहे. जिल्हा परिषदेमार्फत नुकतेच या ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडळी ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेकडील टोक असणारे पाडळी हे गाव आहे. या गावाला पाणी टंचाईच्या झळा नेहमीच बसत असत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व संपूर्ण गावाने ओळखले आहे. या ग्रामपंचायतीने २०१६ ते २०२० अखेर सलग पाच वर्षे गावात कोणत्याही साथीच्या आजारांचा प्रसार होऊ दिला नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले होते. स्वच्छ, शुद्ध आणि योग्यप्रमाणात पाण्यात मिसळावयाच्या घटकांचा वापर केला होता. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदअंतर्गत पिण्याच्या पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षणअंतर्गत सलग पाच वर्षे ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड मिळाले आहे. खरंतर पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका असते. ती भूमिका पाडळी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव मारुती कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडली. ग्रामपंचायतीनेही नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच सुहास जाधव, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, पुष्पा जाधव, विद्या शिंदे, ग्रामसेवक जे. एस. ढाणे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव कुंभार यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.
०७मसूर-पाडणी
पाडळी (ता. कऱ्हाड) येथे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच सुहास जाधव उपस्थित होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)