सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यामध्ये आरोपी सागर बाबू परमार (वय २८) आणि हमीद रहिम शेख (वय २९, रा. कार्वे नाका कऱ्हाड) या दोघांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, या खटल्यात आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील व सल्या चेप्यासह नऊजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्याचा निकाल पावणेसहा वर्षांनंतर लागला.या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दि. १५ जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र केसरी संजय पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत कऱ्हाड येथील हॉटेल शिवदर्शनमधून चहा पिऊन बाहेर येत होते. त्याचवेळी दोन अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संशयित अकरा आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये विलासराव पाटील-उंडाळकर याचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील यांचाही समावेश होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण ६५ साक्षीदार तपासले. तसेच अण्णा गावडे, हणमंत पवार, बाबासाहेब पाटील या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह १७ साक्षीदार फितूर झाले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सागर परमार आणि हमीद शेखला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलीजिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. श्रीकांत जाधव यांनी बचाव पक्षातर्फे काम पाहिले. (प्रतिनिधी)‘राजकीय असूयेपोटी उदयसिंहांना गोवले!’‘अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अनावश्यक जादा तपास करण्याचा फार्स केला. पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केलेला तपास न्यायाधीशांनी स्वीकारला. उदयसिंह पाटील यांना राजकीय असुयेपोटी गोवण्यात आले आहे. जादा तपास म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आणि राजकीय द्वेषापोटीच उदयसिंहांना अडकविण्यात आले आहे, अशा प्रकारे न्यायाधीशांनी पोलिसांवर ताशेरे ओढले,’ अशी माहिती बचाव पक्षाचे वकील धैर्र्यशील पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
संजय पाटील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा
By admin | Updated: October 18, 2014 23:27 IST