फलटण : विविध गिरीभ्रमण मोहिमेत यशस्वी झालेल्या बार्शी, जि. सोलापूर येथील सुलाखे हायस्कूलच्या पाचवीतील दोघा विद्यार्थ्यांनी सुमारे ३५० किलोमीटरचा सायकल प्रवास करून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे. या विद्यार्थ्यांचे फलटणकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. बार्शी ते किल्ले रायगड सायकल मोहिमेस बार्शी येथून शनिवार, दि. ३१ मे रोजी प्रारंभ केला. कुर्डुवाडी, टेंभुर्णी मार्गे नीरा नरसिंहपूर येथे मुक्काम करून अकलूज, माळशिरस, नातेपुते मार्गे फलटण येथे मुक्काम केला. लोणंद, शिरवळ मार्गे भोर येथे मुक्काम, दि. ३ जून रोजी वाघजाई, वरंदाघाट मार्गे वरंदगाव येथे मुक्काम, दि. ४ जून रोजी ढालकाठी मार्गे महाड येथे पोहोचून तेथे मुक्काम, दि. ५ जून रोजी किल्ले रायगड येथे मुक्कामी पोहोचून शुक्रवारी होणार्या शिवराज्याभिषेक ३४१ व्या सोहळ्यास हे दोघे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. हिंदवी परिवार आणि न्यू हायकर्स गु्रप, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी ते रायगड या ३५० किलोमीटर सायकल साहस मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे या दोघा विद्यार्थ्यांनी फलटण भेटीदरम्यान स्पष्ट केले. आदित्य वीरेंद्र दसंगे, ह्षीकेश थिटे यांनी नवव्या वर्षांपासून वीर शिवा काशीद स्मारक व पावन खिंड, पन्हाळगड, वासोटा किल्ला, जीवधन किल्ला, हडसर, नाणेघाट, प्रतापगड व पुरंदर किल्ल्यावर प्रतिवर्षी गिरीभ्रमण मोहिमेत सहभागी होऊन यश प्राप्त केले आहे. अंतरराष्ट्रीय सायकलपटू व प्रशिक्षक क्षितीज बेलापुरे (रा. कराड) यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य दसंगे व हृषीकेश थिटे या विद्यार्थ्यांनी यावर्षी प्रथमच सायकल मोहिमेत सहभाग घेतला आहे. (प्रतिनिधी)
शिवराज्याभिषेकासाठी चिमुरड्यांची रायगडस्वारीं
By admin | Updated: June 6, 2014 00:02 IST