वाई : वाई शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्यासुमारास वाई शहर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे, ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोग पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यासह वाई तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामध्येच शनिवारी संध्याकाळी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला, तरी पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे व मोहर झडून गेला आहे.
ढगाळ वातावरण असेच राहिल्यास आंबा उत्पादन अडचणीत येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. जनावरांसाठी ठेवलेला चारा थोडाफार भिजला असला, तरीही नुकसान मात्र झाले नाही. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये व्यापारी व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. अवकाळी पावसाच्या सरी वाई शहरासह वाईच्या पश्चिम भागात पाचवड येथे जवळपास एक तास पडत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
चौकट :
साताऱ्यातही पावसाच्या सरी
साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचप्रमाणे पाऊसही हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळी आठच्यासुमारास तसेच सायंकाळी साडेचारच्यासुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही प्रमाणात पळापळ झाली होती.
फोटो
०९वाई-रेन
वाई शहरात शनिवारी सायंकाळी अचानक मोठा पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. (छाया : पांडुरंग भिलारे)