परळी : सातारा तालुक्यातील ठोसेघर पठारावर असणारी पांगारे व पळसावडे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. असे असले तरी सांडव्यांच्या दुरवस्थेमुळे या धरणांना कायमचा धोका निर्माण झालेला आहे. सांडव्याला भगदाड पडले असून, भराव खचून धरणाच्या भिंतीवर काही ठिकाणाहून पाझर फुटले आहेत. वेस्ट वेअर विमोचन विहिरीतूनही पाण्याचे पाट वाहत आहेत. पांगारे व पळसावडे या धरणांच्या सांडव्याबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर प्रकल्पाच्या कामात काही त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी उपाययोजना करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र, हे नियोजन कागदावर राहिले आहे. तसेच पळसावडे धरण प्रकल्पास गळती असल्याचे पाटबंधारे विभागाने लेखी पत्र पळसावडे ग्रामपंचायतीस दिले आहे. मात्र, त्यावरही काहीच उपाययोजना झालेली नाही. पांगारे प्रकल्पाची घळभरणी २००० साली पूर्ण झाली. घळभरणीदरम्यान तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यानेच या प्रकल्पास गळती लागत आहे. प्रकल्पाच्या मुख्य पायात पायाभरणी व इतर काही बाबी आवश्यक असतात. तसेच भूस्तरावरील वैज्ञानिक चाचणी व्यवस्थित न झाल्याने या प्रकल्पाला धोका पोहोचू शकतो, असे सांगण्यात येत आहे. २००६-०७ यावर्षीच्या कालावधीत झालेले दगडी पिचिंगचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. दगडी पिचिंगचे काम वाहून गेलेले आहे. प्रकल्प व सांडव्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून टाकलेला मातीचा भराव पूर्णपणे खचलेला आहे. पांगारे प्रकल्पात २.७२ दशलक्ष घ. मी. पाणीसाठी आहे. या परिसरात २५०० ते २७०० मिमी पावसाची नोंद होते. प्रकल्पाचे निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारांची बिले संबंधित विभागाने काढलीच कशी ? याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सद्य:स्थितीत धरणाचा वॉल, कॅनॉल, सांडव्याच्या धराच्या भिंतीबाजूचा भाग यामधून पाणी वाहत आहे. धरणाच्या भिंतीवरील पिचिंगचा दगड-मातीचा भराव खचला आहे. भिंतीवर मोठी झुडपे उगवली आहेत. १९९६ साली या प्रकल्पाचे काम सुरू होऊन २००१ मध्ये पाणीसाठा झाला. सज्जनगड, वाघवाडी, कारी या गावांना यामधून पाणीपुरवठा होतो. मात्र, पांगारे गावाची एक गुंठा जमीनही ओलिताखाली येत नाही. प्रकल्पासाठी जमीन संपादित करून १७ वर्षांनंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पळसावडे धरणाच्याही अशा अवस्थेमुळे सांडव्याला भगदाड पडलेले आहे. त्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्र वाहून गेलेले आहे. २००४ पासून विमोचन विहिरीचा व्हॉल्व्हच उघडला असून, तो आजही तसाच आहे. या धरण प्रकल्पाची १८२४.४५ दशलक्ष घ.मी. इतकी पाणीसाठ्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या विमोचन विहिरीत अहोरात्र १२ महिने पाणसाठा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाणी न सोडताच धरणाचा तळ दिसतो. या प्रकल्पाच्या भिंतीवर सोलिंग पिचिंगचे काम निम्मे केले आहे. सांडव्याचे काम अर्धवट आहे. (वार्ताहर) निधी पोसण्यासाठीच का ?पांगारे प्रकल्पाच्या कालव्याला गळती असून, पाणी न सोडताच उन्हाळ्यात हा प्रकल्प निम्मा रिकामा होतो. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे पैसे नसताना बंदिस्त पाईपसाठी सव्वातीन कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे सांगण्यात येते. धरणात पाणी नाही मग बंदिस्त पाईपलाइन कशासाठी? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. हा निधी शेतीला पाणी मिळण्यासाठी की ठेकेदार, अधिकाऱ्यांना पोसण्यासाठी? असा संतापजनक सवालही नागरिकांनी केला आहे.
पांगारे, पळसावडे धरणांना धोक्याची घंटा !
By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST