कराड
ई-पीक पाणी तलाठ्यांनी करावी अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी शिवाजी पाटील, योगेश झाम्बरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने ई-पीक पाणी करण्याचा आदेश काढला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून शेतात जाऊन ऑनलाइन पीक नोंद करायची आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.
राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात मोबाइल टॉवर नसल्याने मोबाइलला रेंज येत नाही. इंटरनेटला स्पीड कमी आहे. त्यामुळे पीक पाणी अपलोड करताना फ़ोटो काढताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंद होत नाही. आजही बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काही शेतकरी स्मार्ट मोबाइल वापरण्याबाबत अडाणी आहेत. त्यामुळे त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागत आहे.
शासनाने ई-पीक पाणी नोंदीं दिलेल्या मुदतीत झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज सोसायटी मिळणार नाही. साखर कारखान्याला ऊस नोंद होणार नाही. दुष्काळ, महापूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. आपली व्यवस्था पूर्ण डिजिटल झाली नसताना ई-पीक नोंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा कमी, नुकसान जास्त होईल. यासाठी लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या ई-पीक पाण्याची समस्या सोडवावी.
सरकारने या सर्व बाबींकडे लक्ष देऊन एक तर एखाद्या एजन्सीला ई-पीक पाणी नोंदीचे काम द्यावे, अथवा तलाठ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ई-पीक नोंदी करण्याचा निर्णय घ्यावा. जर नोंदीची कामे शेतकऱ्यांनीच करायची असतील तर तलाठी पदे रद्द करून त्यांच्या पगारावर शासनाचा, पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.