कांद्याला मिळतोय किलोला ५ पासून १५ रुपयांपर्यंत भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:18+5:302021-03-20T04:39:18+5:30
सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...

कांद्याला मिळतोय किलोला ५ पासून १५ रुपयांपर्यंत भाव !
सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ५०० पासून १५०० ते १६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी, टमाट्यानंतर आता वांग्याचा दर एकदम खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची २४८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील १५ दिवसांपूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ३५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर एकदमच दर गडगडला.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५२ वाहनांतून ३९७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये बटाटा ६१, लसूण ३६ आणि आल्याची १६ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. गवरचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला २०० ते २५० पर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आला, तर वांग्याला १० किलोला ६० ते ८० रुपये दर मिळाला. टमाटा ४० ते ६०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर एकदमच कमी झाला आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १०० अन् दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.
बटाट्याला क्विंटलला १२०० हजारांपासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारांपासून तीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १५००पर्यंत दर मिळाला. आल्याला दर आणखी कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे, तर लसणाला क्विंटलला २ ते ४ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही कमी होऊ लागला आहे. वाटाण्याला पाच हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
चौकट :
मेथी, कोथिंबीर दरात सुधारणा...
सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या दीड हजार पेंडीची आवक झाली. याला शेकडा ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ३०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला, तर पालकला शेकडा २०० ते ३०० रुपये दर आला.
......................................................