सातारा : विहीर खोदताना मातीचा भराव अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातल्या दरे गावाच्या परिसरात ही घटना घडली. हरीचंद्र दौलत जाधव (वय ५५, रा. दरे, पो. आरे, ता. सातारा) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दरे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. या कामावर गावातीलच सात ते आठजण काम करत आहेत. हरीचंद्र जाधवही या विहिरीच्या कामावर होते. विहिरीत उतरून खोदकाम करत असताना विहिरीच्या काठावर असलेला मातीचा भराव अचानक त्यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला जबर मार लागला. त्यांना तत्काळ साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रविवारी दुपारी एक वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
विहीर खोदताना भराव अंगावर पडल्यानं एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 21:14 IST