मुक्कामी येणारी बस आगारातच थांबली, नोकरदार प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:31+5:302021-08-01T04:35:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील ...

The oncoming bus stopped at the depot, inconvenience to the employed passengers | मुक्कामी येणारी बस आगारातच थांबली, नोकरदार प्रवाशांची गैरसोय

मुक्कामी येणारी बस आगारातच थांबली, नोकरदार प्रवाशांची गैरसोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये अजूनही बंद आहेत. त्याचप्रमाणे संचारबंदीचे निर्बंध कायम असल्याने संध्याकाळी एस. टी.ला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, त्यामुळे गावोगावच्या मुक्कामी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्यावर्षी मार्चमध्ये झाला. त्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक बसला. तेव्हापासून एस. टी. महामंडळाची आर्थिक घरी विस्कटली. ती पूर्ववत आणण्यासाठी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही याचा परिणाम महामंडळाच्या फेऱ्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्ण तसेच मृत्यूदर वाढतच आहे. तिसरी लाट लवकर येईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये अजून सुरू केलेली नाहीत. एस. टी.ला ग्रामीण भागातील सर्वाधिक उत्पन्न हे विद्यार्थी पासच्या माध्यमातून मिळते. उत्पन्नाचा हा स्रोत बंद असल्याने एस. टी. महामंडळाने ग्रामीण फेर्‍या कमी करून त्या शहराकडे वळवल्या आहेत.

रुग्णवाढ विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध कायम ठेवले आहेत. बाजारपेठा लवकर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे काही कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थ लवकर जात असल्याने बसस्थानकांमध्ये रात्रीच्या वेळी शुकशुकाट जाणवतो. त्यामुळे पूर्वीच्या ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या बंद करण्याची नामुष्की एस. टी. महामंडळावर आली आहे.

चौकट :

८० टक्के बसेस आगारातच

शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेळेत येता यावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून ग्रामीण भागांमध्ये मुक्कामी गाड्या सोडल्या जात होत्या. ही संख्या कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी अडीचशेच्या घरात होती.

कोरोनामुळे बदलती स्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने काही दिवसांपासून मुक्कामी गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिकाम्या गाड्या चालविणे परवडत नाही. त्यामुळे त्या कमी करून सध्या केवळ ८२ फेऱ्या सुरू आहेत.

सध्या सुरू असलेल्या मुक्कामी फेऱ्या प्रामुख्याने राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जास्त आहेत. तुलनेत ग्रामीण भागात अजूनही ही संख्या रोडावलेलीच आहे.

चौकट

रुग्ण घटले एस. टी. कधी सुरू होणार

मुक्कामी बस सुरू करण्यामध्ये कोरोनामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता रुग्णसंख्या घटत आहे, त्यामुळे एस. टी. कधी सुरू होणार, हे प्रशासनाने सांगण्याची गरज आहे.

- शुभम शहापुरे, सातारा.

नोकरीच्या निमित्ताने अनेकांना दररोज सकाळी नऊपर्यंत ग्रामीण भागातून साताऱ्याला पोहोचायचे असते. मात्र, मुक्कामी गाड्या सुरू नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- प्रफुल विभुते, सातारा.

चौकट

आगारनिहाय मुक्कामी गाड्या

आगार सध्या कोरोनापूर्वी

सातारा ५ २८

कऱ्हाड ५ ३१

महाबळेश्वर ५ ३०

खंडाळा ५ १७

वडूज ५ १९

कोरेगाव ४ २४

पाटण ४ २२

दहिवडी ४ १८

वाई ३ १४

फलटण २ ३५

मेढा ० १२

Web Title: The oncoming bus stopped at the depot, inconvenience to the employed passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.