सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या त्सुनामी लाटेत आम्ही महाराष्ट्रात मित्रपक्ष काँग्रेसपेक्षा वरचढ ठरलो असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा येथे निर्धार मेळाव्यात ठणकावून सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आम्ही १४४ जागांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले.सातारा येथे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला. मेळाव्यात तटकरे आणि पवार यांच्याबरोबरच जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही काँग्रेसवर खरपूस टीका केली.लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करतच तटकरे यांनी विधानसभेला कार्यकर्त्यांनी सतर्क राहून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘गुजरात विकासाचे मॉडेल चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेची दिशाभूल केली. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला, मात्र गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या कामाचा आढावा लक्षात घेता ‘अच्छे दिन’ कुठे गेले, याचा शोध घ्यावा लागतो.’निर्धार मेळाव्यात प्रमुख मान्यवरांनी काँग्रेसकडून खच्चीकरण होत असल्याची तक्रार केली. त्याचा संदर्भ देत तटकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमचा एक नंबरचा शत्रू असल्याचे जर काँग्रेसचे नेते म्हणत असतील, तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल. सातारा जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्यांची पिळवणूक होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला स्वबळावर राष्ट्रवादीचे सरकार आणावयाचे आहे. त्या अनुषंगाने आपण साऱ्यांनी मिळून सत्ता स्थापनेच्या निर्धाराने पावले टाकूया. आपल्याला सोशल मीडियावर भर द्यावा लागणार असून, त्याची सुरुवात साताऱ्यातून करूया, असे आवाहनही तटकरेंनी केले. (प्रतिनिधी)आम्ही व्यवहाराने जागा मागतोयआगामी विधानसभेसाठी आम्ही १४४ जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार करतच अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, ‘लोकसभेला आमच्या चार जागा असल्या तरी तुमच्यापेक्षा दुप्पट आहेत. आम्ही व्यवहाराने जागा मागतोय, आमच्याही कार्यकर्त्यांनी आता किती दिवस फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांनाही आमदार म्हणून मिरवू द्या.’‘कऱ्हाड दक्षिण’चा विषय काँग्रेसचा‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अजून आमच्यात जागा वाटपाची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल, हा निर्णय आमचा आहे. ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसची आहे. तेथे काँग्रेसचा उमेदवार कोण असावा, हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलणे टाळले.
राष्ट्रवादीला १४४ जागा हव्याच!
By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST