‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपावा : कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:42+5:302021-06-21T04:25:42+5:30
रामापूर : ‘जिल्ह्यात नव्हे तर पाच जिल्ह्यांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्त्व हाच यामागील ...
रामापूर : ‘जिल्ह्यात नव्हे तर पाच जिल्ह्यांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्त्व हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे ते खऱ्याअर्थाने समजले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही तर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे,’ असे मत पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पाटणमधील शिरळ येथील शासकीय गोदाम परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोपे, जिल्हा लेखा परीक्षक रवींद्र पन्हाळे, पाटण पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव, पुरवठा अधिकारी सागर ठोंबरे, महादेव अष्टेकर, शिरळचे सरंपच नवनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून प्राणवायू आपल्याला फुकट मिळतो आणि आपण झाडांची कत्तल करत सुटलो आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्लास्टिकचाही वापर टाळला पाहिजे. कापडी पिशव्यांचा वापर करावा, वृक्षतोड करू नका. निसर्गाच्या विरूध्द कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. वृक्ष लावून त्याचे जतन करावे. झाडे आहेत म्हणूनच आपण आहोत, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.’
जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते म्हणाल्या, ‘हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळली आहे. हवेतील ऑक्सिजन वाढणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने जिल्ह्यात वीस गोदाम परिसरात अशी झाडे लावली जाणार आहेत. वडाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला माहीतच असून, त्याद्वारे आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो. केवळ वृक्षारोपण करून जबाबदारी संपली नाही तर त्या वृक्षांचे जतन करून ती जपलीही जाणार आहे. काही वर्षाने त्याला बहारदार रूप येईल.’
आंबा, फणस, वड, पिंपळ, आवळा अशा देशी रोपांचे यावेळी रोपण करण्यात आले. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी स्वागत केले तर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तलाठी भरत जाधव, ग्रामसेवक सी. आर. मिसाळ, राहुल खंदारे, विठ्ठलराव पाटील, सचिव इम्तियाज शेख उपस्थित होते.