कवठे : कवठे, ता. वाई येथील बगाड यात्रेस दि. २७ एप्रिल पासून प्रारंभ झाला असून, यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. या यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक कवठे येथे दाखल झाले होते. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’च्या जयघोषाने कवठेनगरी दुमदुमली होती.यात्रेच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता भैरवनाथ मंदिरात कौल लावण्यात आला. सात ग्रामस्थांनी यंदा बगाड्या होण्यासाठी कौल आजमावला. यापैकी यशवंत घाडगे यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान घाडगे यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण केले. यानंतर पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे कृष्णराव डेरे यांच्या भावकीतील बैलामार्फत पोहोचविण्यात आला. कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून, या अकरा भावकीच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते. यास खुता असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो. दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’ या गजरात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले. ठराविक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यामुळे अरिष्ट टळते असे मानले जाते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बगाड कवठे गावात आले. यावेळी बगाड्यास खांद्यावरून भैरवनाथ मंदिरात नेऊन त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.बगाड यात्रेसाठी राज्यभरातील भाविक कवठे येथे दाखल झाले होते. यात्रेनिमित्त रात्री छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)गावोगावच्या एकीचे दर्शनवाई तालुक्यातील कवठे, सुरूर, पांडे, बावधन, फुलेनगर गावात बगाड यात्रेची परंपरा असून, बगाड यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी संपूर्ण गावाची एकी व एकमुखी निर्णयावर बगाड मार्गपरिक्रमण करीत असते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकमेकांशी सुसंवाद साधत असल्याने ज्या गावात बगाड यात्रा आहे त्या गावातील एकोपा वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. याचा फायदा गावाच्या संपूर्ण जडणघडणीवर होत असल्याने परिसरात ही गावे प्रगत होत आहेत.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कवठे येथे यात्रेनिमित्त दि. २८ रोजी प्रकाश अहिरेकर यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले असून, संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पै. विकास राजगे व किसन शेळके यांची ५१ हजार रुपये व चांदीची गदा यावर कुस्ती होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांसमवेत जंगी फडाचे आयोजन यात्रा कमिटी मार्फत करण्यात आले असून, महिलांसाठी दि. २९ रोजी सुरेखा पुणेकर यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘काशिनाथाचं चांगभलं’नं कवठेनगरी दुमदुमली
By admin | Updated: April 28, 2016 00:03 IST