लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही या निर्णयापर्यंत राज्य सरकार पुन्हा आले असतानाच राज्यातील वाढती कोरोनाची आकडेवारी आणि जनतेचा हलगर्जीपणा यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. पण तरीदेखील कोरोनाचे युद्ध संपलेले नाही. खटाव तालुक्यातही कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ हजार १४९ झाली आहे. तरीही अनेक मंडळी निष्काळजीपणे वावरत असून अनेकांचे मास्क गळून पडले आहेत.
कोरोनावर लस आली हाच तो काय मागील वर्षात मिळालेला दिलासा होता. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सर्व ते प्रयत्न करून पाहिले. सध्याची आकडेवारी पाहता आता ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करत होते. आजही करत आहेत. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. लॉकडाऊनला लाखोली वाहिली जात असेल आणि सरकारच्या नावाने बोटे मोडली जात असतील तरी नियमाचे पालन करणे हाच कोरोनाचा प्रसार थांबवण्याचा उपाय असल्याचे सत्य नाकारता येणार नाही.
आताही दोन दिवसांपासून रूग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली दिसू लागली होती. पहिल्या लाटेच्या वेळी काही त्रुटी निश्चीत होत्या. त्यावेळी सुविधा नव्हत्या. या महामारीची पूर्ण माहिती नव्हती. मात्र आता तसे नाही, सुविधा असल्या तरी रुग्णवाढ होऊ लागली. तरीही कोणाचा विश्वास बसणार नाही इतका बिनधास्त कारभार सगळीकडेच सुरू आहे. प्रत्येक बाब सरकार आणि प्रशासन यांच्यावर टोलवताना नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आणि कर्तव्ये असतात याचे समाजभान ठेवले गेले नाही. टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जात होती तेव्हा समजून घेणे आवश्यक होते. या काळात सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, बार एवढेच नव्हे तर चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असणारा मास्क गायबच झाला होता. सामाजिक अंतर कधीच मिटले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत गेली.
चौकट
४७० जणांनी गमावला जीव
खटाव तालुक्यात आजअखेर १७ हजार १४९ बाधित रुग्ण होते. त्यापैकी १५ हजार ६७७ रुग्ण बरे झाले आहेत. या काळात ४७० जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या तालुक्यात १ हजार सात बाधित रुग्ण असून कोरोना केअर सेंटरला १०५, कोरोना सेंटरला १५६, खासगी दवाखान्यात ३३, होम आयसुलेशनमध्ये ५५९ तर १५७ स्कूल आयसुलेशनमध्ये आहेत. वडूज शहरातील पन्नास बाधित रुग्ण दगावले आहेत. सध्या शहरात पंचवीस बाधित रुग्ण आहेत.
फोटो
२५वडूज
खटाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी चौकाचौकांत गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. (छाया : शेखर जाधव)