प्रमोद सुकरे
कराड - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकारण गतिमान झाले आहे. त्याचाच भाग म्हणून अनेक राजकीय पक्षांनी पक्ष बांधणीला प्राधान्य दिले असून 'भाजप', 'शिंदेसेने' पाठोपाठ आता 'काँग्रेस'नेही नवा जिल्हाध्यक्ष जाहीर केला आहे. कराड, पाटण आणि खटावकरांवर ही धुरा दिलेली दिसते.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश खेचून आणण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.
खरंतर सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणुकीला ही भाजपने चांगलेच यश मिळवले. त्यामुळे भाजपमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. त्यातच त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत संघटन पर्व २ राबवले. १०० बूथ चे एक मंडल व त्याचा मंडल अध्यक्ष अशा पद्धतीने रचना करत त्यांनी एकाच तालुक्याला २/३ तालुकाध्यक्ष बनवले. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेमध्ये अनेक नावे चर्चेत असताना गत महिन्यात ऐनवेळी कराडचे भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली गेली.
महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्ह्यात २ आमदार आहेत. पैकी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आहे. त्यामुळे त्यांनी देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वेध घेत आपल्याच खास निष्ठावंत शिवसैनिकाला म्हणजे जयवंतराव शेलार यांना पुन्हा एकदा जिल्हाप्रमुखपदी संधी दिली आहे.त्यांच्याकडे कराड दक्षिण,उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघ सोपविण्यात आले आहेत.तर कोरेगाव चे रणजित भोसले व सातारचे चंद्रकांत जाधव या दोघांकडे उरलेल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना जिल्हा समन्वयक म्हणून विशेष जबाबदारी दिली आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात मोठी मरगळ निर्माण झाली आहे.अशा पार्श्वभूमीवर नव्याने पक्ष संघटना बांधताना जिल्ह्याची धुरा नेमकी कोण सांभाळणार? याबाबत उलटसुलट चर्चा होती. जिल्हाध्यक्ष पदासाठी ३ नावांची शिफारस झाले होते. अखेर रणजीत देशमुख यांच्या नावावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले आहे.पण अजून एकाला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्ते वर्तवीत आहेत.
काँग्रेसने फक्त खांदा बदलला तालुका तोच
काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष हे खटाव तालुक्यातील पुसेगाव चे डॉ. जाधव होते. आता नवीन अध्यक्ष करताना खटाव तालुक्यातीलच रणजीत देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष निवडीत फक्त खांदा बदलला तालुका तोच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता परीक्षा द्यावी लागणार
जिल्हाध्यक्ष पदाची झूल अंगावर घेतल्याने या तिन्ही जिल्हाध्यक्षांना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे.त्यासाठी सुरुवातीला डोळ्यात तेल घालून बराच अभ्यास करावा लागणार आहे.मग कुठे परिक्षेला धीटपणे सामोरे जाता येईल.आता या परीक्षेत कोणाला किती टक्के गुण पडतात हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे.