सातारा : पोलिसांची नजर चुकवून कागदपत्रे किंवा शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांनी अनेकदा फेरफार केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून यंदाची पोलीस भरती पारदर्शक होण्यासाठी संपूर्ण भरतीवर ‘अभिनव’ वॉच ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलीस दलाने स्वत: पैसे खर्च करून एक सॉफ्टवेअर तयार करवून घेतले असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उमेदवारांची कागदपत्रे आणि गुणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे साहजिकच वशिलेबाजीला लगाम बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस परेड मैदानावर पोलीस शिपाईपदासाठी भरती सुरू आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे प्रत्येक उमेदवारांवर नजर ठेवली जात आहे. मात्र सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नजरचुकीने एखाद्याला जादा किंवा कमी मार्क मिळाले असतील तर या सॉफ्टवेअरमुळे लगेच ही बाब समोर येणार आहे. हे सॉफ्टवेअर देशमुख यांनी पहिल्यांदाच खास पोलीस भरतीसाठी बनवून घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात पोलीस भरती झाली होती. त्यावेळी बनावट कागदपत्रे देऊन काही उमेदवार भरती झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा जिल्हा पोलीस दलाने असे प्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख या भरतीप्रक्रियेवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पोलीस परेड मैदानावर तळ ठोकून असतात. उमेदवारांना भरतीसंदर्भात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी मैदानामध्ये सूचनाफलकही लावण्यात आले आहेत. केवळ कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने मुलांचे नुकसान होते. त्यामुळे अधीक्षक देशमुख यांनी सर्व मुलांची कागदपत्रे तपासणीसाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. काही मुलांकडून मूळ कागदपत्रे किंवा चुकून एखादे सर्टीफिकेट विसरते. त्यामुळे काहीजण पोलीस भरतीपासून वंचित राहतात. अशा मुलांचाही त्यांनी सहानुभूतीने विचार केला आहे. लांब उडीसाठी मैदानावर खास समुद्रकिनाऱ्याची माती आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचणीदरम्यान मुलांना कसल्याही इजा झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)
पारदर्शक भरतीसाठी ‘अभिनव’ वॉच !
By admin | Updated: June 10, 2014 02:15 IST