लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सह्याद्रीच्या कुशीत निसर्गस्थळे लपली आहेत. त्याचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. कोयना जल पर्यटन प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना बाहेर नोकरीसाठी जावे लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योग पळवले म्हणतात, मग राज्यात पाच लाख कोटींचे रोजगार आले नसते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मुनावळे, (ता. जावळी) येथे कोयना जलाशयाच्या तीरावर महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.