सातारा : कोविडच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ तर दुसऱ्या लाटेत कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पडले आहेत. कोविडमुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना शासनाने मदत जाहीर केली आहे. मात्र, पितृछत्र हरपलेल्या बालकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदत करण्यासाठी समाजातील संवेदनशील नागरिक पुढे सरसावले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट भयंकर ठरली. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या लाटेत मृत्युदर वाढला आणि अनेक सुखी कुटुंबे अक्षरश: चार-आठ दिवसांत उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यातील २१ हून अधिक कुटुंबांनी त्यांचा प्रमुख हरविला आहे तर दोन कुटुंबांत आई-वडील दोघांचाही कोविडने मृत्यू झाला आहे. ० ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे आई आणि वडील दोन्हीही कोरोनामुळे गेले आहेत, अशांना शाासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्या मुलांचे वडील गेले आणि आई गृहिणी आहे अशा कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
पालक हिरावलेल्या मुलांचे सर्वेक्षण जिल्हा बालसंगोपन विभागामार्फत केले जात आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या साडेतीन हजार व्यक्तींची यादी विभागाला मिळाली आहे. त्यातील किती जणांच्या पश्चात लहान मुले आहेत याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या यादीवर आत्तापर्यंत अवघ्या २१ मुलांची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती समजणार आहे. बाल विभागाने तरुण पालकांच्या कुटुंबातील मुलांची माहिती घेतली. मात्र काही ठिकाणी वयस्क पालकांच्या घरीही लहान मुले आढळत आहेत. उशिरा अपत्यप्राप्ती, मूल दत्तक घेतलेल्या पालकांच्या घरी अशी लहान मुले आढळून येत आहेत. शासनस्तरावर सर्वेक्षण अद्यापही सुरू असून, नागरिकांनीही अशा मुलांची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ येथे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्यांना मदत कोण करणार?
चौकट
१. एसटीत वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू कोविडने झाला. त्यांची पत्नी गृहिणी, दोन लहान मुलं, त्यांची आई आणि आत्या असं कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होतं. मृत्यू पश्चात मिळणाऱ्या रकमेतून गृहकर्ज भागवलं तर घरखर्च, मुलांचं भवितव्य आणि ज्येष्ठांचं आजारपण यासाठी त्यांच्याकडे काहीच उरणार नाही.
२. बहिणीच्या निधनानंतर मामा म्हणून तिच्या मुलांची जबाबदारी घेतलेल्या गृहस्थाच्या मृत्यू पश्चात कुटुंबावर चार मुलांची जबाबदारी येऊन पडली. बेताची आर्थिक परिस्थिती आणि कमावणारे दोनच हात असल्याने या मुलांच्या भवितव्याचेही चित्र धूसर असेच दिसत आहे. शासन दरबारी बहिणीची मुलं म्हणून त्यांना मदत मिळणे शक्य नाही.
३. लग्नानंतर पंधरा वर्षे अपत्यप्राप्ती न झालेल्या कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी बाळ दत्तक घेतले. गतवर्षी कोविडच्या लाटेत वडिलांची नोकरी गेली. कोविड काळात नवी नोकरी शोधण्यापेक्षा त्यांनी साठवलेल्या रकमेतून व्यवसाय सुरू केला. कोविडने ते गेले. त्यामुळे कुटुंब आणि व्यवसाय उघड्यावर पडले.
दोन जणांचे आईवडिलांचे छत्र हरपले
शासकीय आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील दोन जणांचे आईवडिलांचे छत्र हरपले आहे. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांकडे हे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर अवघ्या दोन जणांनी याबाबत नोंद केली आहे. शासनाची मदत घेतली तर समाज काय म्हणेल म्हणून या मुलांची माहिती शासनाकडे आली नाही.
पॉइंटर :
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण :
बरे झालेले रुग्ण :
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण :
एकूण मृत्यू :