नितीन काळेलसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस कोसळत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ३० टीएमसीवर पाणीसाठा झाला होता, तर अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर - तापोळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड आली. यामुळे रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर नवजा येथे आतापर्यंत ७०१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.जून महिन्याच्या पहिल्या काही दिवसात पावसाने दडी मारली होती. पण, १२ जूननंतर जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला. पूर्व भागात पावसाची उघडझाप आहे. तरीही खरीप हंगामातील पेरणीला वेग येत चालला आहे. पण, पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सायंकाळनंतर अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे १३३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती, तर नवजा येथे १५८ आणि महाबळेश्वरला १५३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर होता. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही धो-धो पाऊस पडतोय. यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास कोयनेत ४५ हजार १२१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. पाच वाजता धरणात ३०.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २८.५६ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.सातारा शहरातही पाऊस सुरूच आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू होती. काहीवेळा जोरदार सरी येत होत्या. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट घेऊनच जावे लागत होते. या पावसामुळे शाळकरी मुले आणि नोकरदारांचे हाल झाले.
धरणात दोन टीएमसीने वाढजिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. तसेच कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या दरम्यानच्या ९ तासात कोयना धरणात जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात रस्त्याचे नुकसानमहाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर - तापोळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक बंद झाली. सकाळपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील वाघिरा - कुरोशी रस्त्यावरही पावसामुळे भराव वाहून आला होता. हा भराव हटविण्यासाठी यंत्रणा पोहोचली होती.
कण्हेर धरणातून विसर्ग; वेण्णा नदीकाठी इशारासातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी रात्रीच्या सुमारास पायथा वीजगृहातून ५०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार होता. शुक्रवारी सकाळी धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.