सातारा : ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सातत्याने घडत असून, बॅंकिंगचा पूर्ण व्यवहार हा आता मोबाईलवरून केला जात आहे. इतकेच नव्हे, तर मोठमोठ्या वस्तूंची खरेदी घरबसल्या करण्यात येत आहे. खिशात रोख पैसे वापरायचेच नाहीत, असे अनेकांचे ठरलेले असते. ई चलनावरच व्यवहार होत आहेत. मात्र, हे व्यवहार करताना खबरदारी तर घेतलीच पाहिजे. शिवाय सतर्क राहणेही गरजेचे आहे.
अलीकडे नवीन प्रणाली वापरत असताना त्याचे धोके ओळखून जबाबदारी अधिक वाढते. अशातच कुठल्या प्रलोभनाला बळी पडल्यास फसवणूक निश्चित आहे. कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही, हे लक्षात ठेवून वापर करावा. एटीएमचा पासवर्ड बरेच दिवस तोच ठेवू नये. केवायसीच्या नावाखाली फोन आला तर त्यांना आपले बॅंक डिटेल्स देऊ नका. वैयक्तिक व्यवहाराची माहिती सुरक्षित राहण्यासाठी ऑनलाईन खरेदी करताना काळजी घ्या.
चाैकट : तपासाची गती संथ असल्याने शिक्षा नाही
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ऑनलाईन फसवणुकीच्या १०५ गुन्ह्यांची नाेंद झाली आहे. या फसवणुकीचा तपास करताना पोलिसांवर बऱ्याच मर्यादा येत आहेत. फसवणूक करणारे हे परराज्यातील असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी बऱ्याच दिव्यातून जावे लागते. कधी गेलेच तर आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे रिकाम्या हाताने पोलिसांना परत यावे लागते. त्याचबरोबर पोलिसांकडे कामाचा ताण असल्यामुळे तपासही संथ गतीने होत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यात बहुदा अद्याप एकालाही शिक्षा झाली नाही.
चाैकट : सायबर क्राइम वाढतोय
२०१६-१९
२०१७-२३
२०१८-३८
२०१९-११
२०२०-१४