कुडाळ : जावळीचा भूभाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला प्रदेश. या ठिकाणच्या जंगलात नानाविध दुर्मीळ वनस्पती आहेत. हा भाग शेकडो वन्यजिवांचे आश्रयस्थान आहे. मात्र, या डोंगरांवर वारंवार लागत असलेल्या वणव्यांमुळे येथील वनसंपदा आणि वन्यजिवांना धोका पोहोचत असून, दुर्मीळ वनस्पती नामशेष होत आहे. हा अधिवास टिकून राहावा, यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
तालुक्याचा पश्चिम भाग डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात वणवे लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नैसर्गिक वणव्यांपेक्षा मानवनिर्मित वणव्यांचीच चर्चा अधिक आहे. वैराटगडचा परिसर, दिवदेवचा डोंगर, कुसुंबीचा डोंगरमाथा, कास, बामणोली, आदी भागांत अनेकदा वणवे लागतात. वनविभागामार्फत या परिसरात अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत. दाट जंगलाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांची राहुटी असते. येथे बिबट्या, तरस, वाघ, लांडगे, भेकर, अस्वल आदी जंगली प्राणी याठिकाणी आढळतात. वणव्यात या साऱ्यांचीच हानी होत आहे.
जावळी तालुका दुर्गम असून, या तालुक्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून येथील जंगलात, डोंगरमाथ्यांवर व पठारावर वणवे लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वणवे लावणाऱ्या विघ्नसंतोषींवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
(चौकट)
अधिवास संकटात
प्राण्यांना चराईसाठी गवताची चांगली वाढ व्हावी, शेतातील पीक बदल व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी शेती भाजतात. याची झळ जंगलांना पोहोचत आहे. आगीच्या वणव्यात जंगलांची अपरिमित हानी होत आहे. यामुळे या अधिवासात राहणारे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत.
(कोट)
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वनसंपदेची जपणूक होणे आज काळाची गरज आहे. वनविभागामार्फत वणव्याची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी जाळपट्टेही काढले जातात. मात्र, मानवनिर्मित वणव्याने येथील बहुतांश वनसंपदा नष्ट होत आहे. वन्यजिवांचा अधिवास नाहीसा होत असल्याने मानवी वस्तीवर याचे दर्शन घडत आहे. यासाठी वणवा लावणाऱ्या विघातक प्रवृत्तीला आळा घालणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
- अंकुश शिंदे, वन कर्मचारी.
फोटो : १६ वणवा