फोटो झेडपीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक ४१ कोटींचे असलेतरी कृषी आणि पशुसंवर्धन विभागासाठी चांगली तरतूद असल्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा घेता येणार आहे. ताडपत्री, कडबाकुट्टी, विद्युत मोटार, दुधाळ जनावरे अनुदानावर मिळणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. यामध्ये विविध विभागांसाठी तरतूद करण्यात येते. बुधवारी जिल्हा परिषदेचे २०२०-२१चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपेक्षा चार कोटींनी हे अंदाजपत्रक कमी आहे. कारण स्व-उत्पन्न कमी झाले आहे. मागीलवर्षी ४५, तर यावर्षी ४१ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये कृषी विभागासाठी २ कोटी २५ लाख, तर पशुसंवर्धनसाठी एक कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या अंदाजपत्रकानुसार नवीन कोणतीही योजना सुरू करण्यात आली नसलीतरी जुन्या योजना कायम पुढे सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे.
जिल्ह्यातील ७० टक्के जनता अधिक करून कृषी उत्पन्नावर आधारित आहे. यामुळे शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने यावर आधारित शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने विविध योजना सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये सवलतीच्या दरात ताडपत्री, कडबाकुटी, तसेच सुधारित संकरित बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे कोळपी, विद्युत मोटार किंवा इंजिन अनुदानावर देण्यात येणार आहे. तर सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठीही काही निश्चित धोरण ठरविण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत जनावरांसाठी औषध पुरवठा करने, विविध शिबिरे आयोजित करणे. कामधेनु योजनेअंतर्गत एक दूध किंवा संकरित देशी गाईंचे वाटप करण्यात येणार आहे. यातून संकरित, दुभती जनावरे तसेच पशुधन वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. कृषी व पशुसंवर्धनच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा हातभारच लागणार आहे. विशेष करून ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना या योजनांचा मोठा फायदा होणार आहे.
कोट :
जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकात कृषी आणि पशुसंवर्धन विभागासाठी चांगली तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन योजना नसल्यातरी जुन्या योजना पुढे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
- मंगेश धुमाळ, सभापती कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद
.........................................................................