सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे. तर पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करुन पश्चिम भागात धुवाँधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरूवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे काहीही पाऊस पडला नाही. पण, जूनपासून कोयनानगरला ९२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आतापर्यंत ११०४ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला जूनपासून १२८७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.७९ टीएमसी ऐवढा पाणीसाठा होता. तर ४७५० क्यूसेक वेगाने पाणी आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.दरम्यान, सातारा शहराबरोबरच परिसरात ढगाळ वातावरणाबरोबर ऊनही पडत आहे. पूर्व भागात खरीप हंगामाची पेरणी अडखळत सुरू आहे. पेरणी पूर्ण होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पश्चिम भागात पावसाची उघडीप; कोयनेतील साठा झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 15:15 IST
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे. तर पूर्व भागात ...
पश्चिम भागात पावसाची उघडीप; कोयनेतील साठा झाला कमी
ठळक मुद्देपश्चिम भागात पावसाची उघडीप; कोयनेतील साठा झाला कमीपूर्व भागात काही ठिकाणी पाऊस असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत