एकमेकांवरील गाढ विश्वासावर बनलं ‘बादशाही’ कुटुंब!कातरखटाव : २८ जणांचे कुटुंब नांदतंय गुण्यागोविंदानं; पाच भावांची फॅमिली आजही एकत्रच...शेखर जाधव ल्ल वडूजनव्या पिढीच्या इच्छा आकांक्षांना वाव, निर्णय स्वातंत्र्य, पारदर्शी व्यवहार, एकमेकांबद्दल आदर आणि भावाभावांमध्ये विश्वासाचे अतूट नाते या पाच मूलमंत्रांवर कौटुंबिक एकतेचा संदेश देत कातरखटाव येथील अठ्ठावीस जणांचे मुल्ला कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रित गुण्या-गोविंदाने नांदत आहे.लहान-थोर सर्वजण कुटुंबासाठी अहोरात्र झटत आहेत. कुटुंब प्रमुख बादशाहभाई आणि त्यांच्या पत्नी कुलसू यांचे कष्ट, संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन दारिद्र्यातून समृद्धीकडे एकीची यशस्वी वाटचाल मुल्ला कुटुंबीयांची सुरू असून, सध्याची पिढी आदर्शवत ठरत आहे.कायम दुष्काळी भाग म्हणून राज्याला परिचित असणाऱ्या खटाव तालुक्यातील कातरखटाव हे गाव विविध कारणांने जिल्ह्याला परिचित आहे. सांगली-भिगवण राज्य मार्गावरील हे गाव वडूजच्या पूर्वेला आहे. सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात मुल्ला कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्य करीत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शेतीमधून चिकाटीने एकमेकांची विश्वासार्हता जपत आलम, सलीम, हनिफ, मुबारक आणि आसिफया पाच भावंडांनी कुटुंबांच्या प्रगतीचा आलेख वाढविला आहे.बादशाहभाई आणि कुलसू यांच्या पोटी पाच मुले आणि दोन मुली अशी सात अपत्ये, घरातील परिस्थिती अगदीच हलाखीची होती. शेतात पिकेल त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा; परंतु शेतीवर उपजीविका होत नसल्याचे पाहून बादशाहभार्इंनी मुंबई गाठली. खासगी नोकरी करीत घरोघरी भांडी विकून कुटुंबाला आधार दिला. त्यांच्या कष्टाला त्यांची पत्नी कुलसू भाभींनी मोलाची साथ दिली. अशिक्षित असूनही मुलांना संस्काराची शिदोरी आणि शिक्षण दिले. संघर्षाशिवाय या जीवनात यश संपादन होत नाही, हे ज्ञात असलेल्या मुल्ला कुटुंबीयांची याच नीतिमूल्यांवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. १९७८ मध्ये बादशाहभाई मुंबईहून पुन्हा कातरखटावला परतले. थोरला मुलगा आलम याने दहावीनंतर प्रपंचाचे रहाटगाडे सांभाळण्यासाठी आखाती देश गाठला. सौदीला फॅब्रिकेशनमध्ये काम करून गावी भावंडांना आधार दिला. दुसरा मुलगा सलीम मुंबई पोलिस झाला. तिसरा हनिफएसटी चालक बनले. चौथा मुलगा मुबारक याने पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले, तर पाचवा मुलगा आसिफ हा पदवीधर असून देखील व्यवसायात उतरला. मुलगी रहामत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरी मुलगी रजिया या गृहिणी आहेत. या कुटुंबीयांची खरी ओळख बादशाही ढाब्यामुळे सर्वदूर पोहोचली असून, या व्यवसायात ग्राहक हाच आपला देवता असल्याचे मानून तशी वागणूक ही दिली जात आहे. त्यामुळेच खूप दूरवरून प्रवास करणारे अनेकजण याच ढाब्यावर जेवायला येतात. कातरखटाव परिसरातच बादशाह फर्निचरचे दुकान टाकले आहे. विचारांची मोकळीक महत्त्वाचीमुल्ला कुटुंबाला गावातच नव्हे, तर तालुक्यात मानाचे स्थान आहे. समाजकारण, राजकारण आणि कुटुंबाबरोबरीने गावचा एकोपा टिकविण्यासाठी सर्वांचीच असणारी धडपड वाखणण्याजोगी आहे. मानव धर्माचे तंतोतंत पालन करीत आपुलकी, जिव्हाळा सांभाळणारे मुल्ला कुटुंबाची ही आजची आधुनिक पिढी एकत्रित उभी आहे. प्रत्येकाच्या विचाराला मोकळीक, एकत्रित जेवण आणि त्याचबरोबरीने कामाचे नियोजन या गोष्टीमुळे हे कुटुंब सर्वांना आदर्श ठरत आहे. स्पष्टवक्तेपणा अंगी असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते, हे माहीत असल्यामुळेच या कुटुंबाच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. १९९३ मध्ये बादशाहभार्इंचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कुलसू भाभींनी मुलांना आधार दिला. भावी पिढी शिक्षणात अग्रेसर राहावी, यासाठी घरातून प्रोत्साहन दिल्यानेच तिसऱ्या पिढीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
एकमेकांवरील गाढ विश्वासावर बनलं ‘बादशाही’ कुटुंब!
By admin | Updated: April 21, 2016 22:22 IST