सातारा : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, फलटण, सातारा, वडूज व वाई विभागांमध्ये वीजचोरीविरोधात धडक कारवाई करून वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २३६ ठिकाणी २६ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी २१२ प्रकरणांत २३ लाख ७२ हजार रुपयांचा दंड व वीजबिलांची वसुली करण्यात आली आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरू केली आहे. महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह सर्व वर्गवारीमध्ये मागेल त्यांना व पाहिजे तेवढ्या वीजभाराची अधिकृत वीजजोडणी उपलब्ध असताना देखील, वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
उघडकीस आलेल्या सर्व वीजचोऱ्यांप्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरू आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
चौकट :
प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबविण्यात येत आहे व आतापर्यंत १८७८ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत, तर ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली देखील करण्यात आली आहे. वीजचोरीविरोधात मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे हे स्वत: या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहे व वीजचोरीच्या विविध प्रकारांची पाहणी करीत आहेत.