अवकाळीने शहरवासीयांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:42 PM2018-11-20T22:42:14+5:302018-11-20T22:42:19+5:30

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. ...

Dry day of city dwellers | अवकाळीने शहरवासीयांची दैना

अवकाळीने शहरवासीयांची दैना

Next

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. सलग तीन तास पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.
पावसाळ्यातील पाऊस थांबल्याने लोकांनी छत्र्या, रेन कोट अशा वस्तू घरात ठेवून टाकल्या होत्या. मात्र, पावसाने अचानक हजेरी लावल्याने पावसाळी जामानिमा पुन्हा शोधून काढावा लागला. पाऊस अवकाळी असल्याने कामासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत असणारे अनेकजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. दुपारनंतर पाऊस विश्रांती घेईल, असे अंदाज बांधून काहीजण रेनकोट, छत्री न घेताच आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले. मात्र पावसाने त्यांनाही गाठले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे, बस स्टॉप, दुकानांची पडचिती, अशा ठिकाणी जागा मिळेल तिथे पावसापासून बचावासाठी लोक उभे राहत होते.
सलग तीन तास झालेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साठून राहिले होते. गोडोली, सदरबझार परिसरातील सैनिक नगर, मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा, जिल्हा परिषद चौक या परिसरात पाणी साठून राहिले. शहरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून राहिले होते.
शहरातील बोगदा परिसरात डोंगराचे दगड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी हे दगड हटवले. दरम्यान, ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते.
सायंकाळ होताच हवेत गारव्याचे प्रमाण वाढले
सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन होत असले तरी किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसवरउतरले आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत थंडीची तीव्रता वाढत चालली आहे.
मंगळवारी सकाळी झालेल्या या पावसामुळे थंडीत आणखीनच वाढ झाली. शहरातसह ग्रामीण भागात आता पहाटे व रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे.
छत्र्या अन् पोत्याची खोळ
पावसाला सुरुवात झाल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील भाजी विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनीही पावसापासून बचाव व्हावा, यासाठी तातडीने सुरक्षित ठिकाण गाठले. पावसाची चिन्हे लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी आपाल्यासोबत छत्र्या आणल्या होत्या. पाऊस पडताच या छत्र्या खुल्या झाल्या. अनेकांनी पारंपरिक पोत्याची खोळ अंगावर घेऊन पावसापासून स्वत:चा बचाव केला.

Web Title: Dry day of city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.