शेंद्रे : सोनगाव तर्फ सातारा हद्दीत अस्तित्वात असलेला, परंतु शासनाच्या दोन्ही बांधकाम विभागाकडे अद्याप नोंद नसलेला रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग खिंडवाडी ते सोनगावपर्यंतच्या या रस्त्याची एक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी विनंती करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे सोनगाव-खिंडवाडी रस्ता बंद करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सोनगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गालगत सोनगाव हद्दीत उतारावर मोठमोठे खड्डे पडून अत्यंत दयनीय झाला आहे. या रस्त्यावरून लोकांना चालणेही अवघड झाले आहे. रस्त्याची खडी निघाली असल्याने व रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी या रस्त्याच्या या परिसरात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रशासनास पत्र लिहून दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत; परंतु रस्त्याच्या मालकीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या दोघांकडूनही टोलवाटोलवी केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नसल्याचे लेखी दिले जात आहे. रस्ता राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग यांना जोडणारा असल्याने या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. हा रस्ता सातारा औद्योगिक वसाहतीला जोडणारा असल्यामुळे या रस्त्याचा वापर शेंद्रे, सोनगाव, आसनगाव, परळी या परिसरातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे अनेक लोक करीत असतात.
एक महिन्याच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दोन्ही मुख्य अभियंत्यांनी संयुक्त चर्चा करून या रस्त्याच्या मालकीसंदर्भात आपली जबाबदारी निश्चित करावी. त्याबाबतचे आदेश द्यावेत, अन्यथा हा रस्ता बंद करण्याची परवानगी मिळाली, असे समजून ग्रामपंचायतीच्या वतीने हा रस्ता रहदारीस बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे सोनगाव ग्रामपंचायतीने दिला आहे.
चौकट
अनेक दिवसांपासून सोनगाव-खिंडवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनाकडे लेखी विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याच्या मालकी व दुरुस्ती संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याची परवानगी मिळावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. एक महिन्यात निर्णय न झाल्यास हा रस्ता रहदारीसाठी बंद करणार आहोत, असा इशारा सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांनी दिला आहे.