औंध : वडी (ता. खटाव) येथे दिनांक २ ते ४ एप्रिलअखेर होणारा व हिंदू-मुस्लिम धार्मिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर हजरत लाडलेमशायक अन्सारी यांचा उरुस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
औंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उरुस कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरवर्षी तीन दिवस उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. माहेरवाशीण महिलांसह हजारो भाविक उपस्थित राहतात. यंदा पुन्हा कोरोनाचे संकट डोक्यावर असल्याने प्रशासनाने उरुस यात्रा साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी गर्दीत होणार नाही, याची काळजी घेऊन साध्या पद्धतीने करण्यात येणार आहेत. उरुसानिमित्त आयोजित करण्यात येणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. यात्रा-उत्सवात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी केले. भाविकांनी याची नोंद घेऊन उरुस कमिटी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.