वडूज : शहरात अनेक इमारतींच्या भिंती धोकादायक बनल्या आहेत. अशा इमारतीच्या मालकांना नगरसेवक, नगरपंचायतीने लेखी नोटीस देऊनही दुर्लक्ष केले जाते. यामुळे मंगळवारी झालेल्या पावसात वडूजमधील एका घराची तटभिंत पडली.
याबाबत माहिती अशी की, येथील लोकवस्ती असलेल्या भाग्योदय नगरातील एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्याची संरक्षक पाठभिंत काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत होती. या परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत. या मार्गावरील रस्ता रूंदीकरण आठ फुटीच असल्याने वाहतुकीच्या रहदारीसह येथील नागरिकांना चालणे कठीण बनत असते. तो बंंद बंगला पंचवीस वर्षे जुना आहे. त्याठिकाणी गाजर गवत साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने घुस, साप, उंदीर यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाने संबंधितांना लेखी नोटीसव्यतिरिक्त कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. बंद बंगला व धोकादायक भिंतीमुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सावध कामकाज करावे लागत आहे. धोकादायक संरक्षक पाठभिंतीलगत निकृष्ट गटर बांधकामामुळे साचलेल्या पाण्यात अन्न शोधण्यासाठी विविध जनावरांचा राबता असतो.
वडूजमधील कर्मवीरनगर, गुलमोहर कॉलनी, सुयोगनगर, नवरत्ननगर, पंतनगर, मुख्य बाजारपेठ आदींसह अनेक भागात याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
फोटो ०७वडूज
वडूज येथे मंगळवारी झालेल्या पावसामुळे धोकादायक तटभिंत पडली. (छाया : शेखर जाधव)