वरकुटे-मलवडी : वावरहिरे (ता. माण) येथील नेहरू युवा मंडळ व मैत्रेय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिरासह ‘हरित गाव, स्वच्छ गाव’ या संकल्पनेतून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पन्नासहून अधिक तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वावरहिरे येथील पानलिंग देवाची यात्रा रद्द करण्यात आली. मात्र, सामाजिक जाणिवेतून गावात काहीतरी लोकहिताचा सामाजिक उपक्रम झाला पाहिजे, या हेतूने तरुणांनी एकत्र येत रक्तदान शिबिरासह ‘हरित गाव, स्वच्छ गाव’ या संकल्पनेतून प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला. यावेळी दहिवडी महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. गायकवाड, मुधोजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधीर इंगळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक गोपी तिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वच वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून श्रोत्यांची मने जिंकली. यामध्ये गावच्या अडचणी, उणीवा आणि गावातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांच्यावर मार्मिक बोट ठेवत युवकांचे प्रबोधन करून, समाजकार्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत वाघ, उपसरपंच सुरेश काळे, मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष किरण वाघ, उपाध्यक्ष स्वप्निल कासार, मैत्रेय फाऊंडेशनच्या माधुरी भोसले, एकनाथ वाघमोडे, गणेश धर्माधिकारी, लखन खुस्पे आणि वावरहिरे येथील तरुण उपस्थित होते.