लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वाई तालुक्यातील आसले येथील तीस वर्षांचा युवक ओमकार चव्हाण याचा निर्घृण खून करणाऱ्या बालपणीच्या चौघा मित्रांना आपण केलेल्या कृत्याची जाणीव पोलिसांच्या खाक्यानंतर उमगली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली. मित्राच्या मदतीला धावलेले सळसळते रक्त आयुष्याची राखरांगोळी करेल, याची किंचितशीही कल्पना नसलेल्या तिघा मित्रांना गजाआड व्हावे लागले.
ओमकार चव्हाण याचे एका युवतीशी अनैतिक संबंध होते. यातून युवतीचा चुलत भाऊ ओमकारवर चिडून होता. तो कधी तावडीत सापडतोय, याची तो वाट पाहत होता. तत्पूर्वी त्याने भुईजमधील एका सराईत गुन्हेगाराकडून रक्तरंजित गुन्हेगारीचे धडे गिरवून ठेवले होते. ओमकारचा कसा काटा काढायचा, पुरावा कसा नष्ट करायचा, याची इत्थंभूत माहिती त्याने कसलेल्या गुन्हेगाराकडून मिळवली होती. आता केवळ तो संधीचीच वाट पाहू लागला. पण सोबतीला बालपणीचे मित्र रोहित घाडगे, समाधान शिंदे आणि सलीम शेख यांना घ्यायचे त्याने ठरवले. मित्रासाठी काय पण, असे म्हणणाऱ्या या तिघांनी मागचा पुढचा विचार न करता त्याच्या कटात सहभागी होण्याचा निश्यच केला. ओमकार दुचाकीवरून पाचवडकडे जात असताना या मित्रांनी त्याचे अपहरण केले. कृष्णानदीकाठी त्याला नेल्यानंतर त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ओमकारचा मृत्यू झाला. म्हणे ओमकारला केवळ भीती दाखवून त्याला सोडून द्यायचे होते. पण त्याचा मारहाणीत मृत्यू झाला. आता आपण पुरते फसलो गेलो, याची जाणीव झाल्याने पुन्हा दुसरा गुन्हा त्यांनी करण्याचं ठरवलं. रात्रीतच ओमकारचा मृतदेह त्यांनी स्मशानभूमीत जाळून टाकला. तासाभरानंतर लगेच त्यांनी राख गोळा करून एका पिशवीत ठेवली. त्यानंतर कृष्णा नदीत ओमकारच्या अस्थी विखरून टाकल्या. जेणेकरून पोलिसांना कसलाही पुरावा सापडू नये म्हणून अत्यंत हुशारीने त्यांनी हा खून तडीस नेला. इतक भयानक घडेल, अस त्यांना म्हणे वाटलं नव्हतं. हे चौघे मित्र पाचवी ते दहावीपर्यंत एकत्रच होते. त्यानंतर महाविद्यालयात त्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या असल्या तरी रोज सकाळ, संध्याकाळ ते एकत्रच असायचे. एके दिवशी मित्राने मनातील सल बोलून दाखवली आणि चौघेहीजण त्याची सल भरून काढण्यासाठी अशा प्रकारे आयुष्य पणाला लावून बसले.
चौकट : माफीचा साक्षीदार उलगडणार रहस्य!
ओमकारचा मृतदेह आरोपींनी जाळून त्याच्या अस्थी नदीत फेकून दिल्याने पोलिसांना पुरावा गोळा करणे अत्यंत अवघड झाले. मात्र, काही अस्थी पोलिसांच्या हाती लागल्या असून, या अस्थीचे डीएनए चाचणी केल्यानंतर तो पुरावा म्हणून पुढे येणार आहे. परंतु यावर विसंबून न राहता पोलिसांनी चौघा मित्रांपैकी एकाला माफीचा साक्षीदार बनवलंय. त्याच्याकडूनच आता या खूनप्रकरणाचं रहस्य न्यायालयात पुरावं म्हणून उलगडणार आहे. या पुराव्याच्या आधारेच आता आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एलसीबी’ची टीम प्रयत्नशील राहणार आहे.
चौकट : पोलिसांचे ४८ तास झोपेविना!
स्थानिक गुन्हे शाखेची अख्खी टीम तब्बल ४८ तास नदीत पुरावे शोधत होती. तहान, भूक हरवून या टीमने पुरावे गोळा केलेत. अक्षरश: दोन रात्री ही टीम झोपली नाही. अत्यंत कौशल्याने हा खून उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या टीमचे कौतुक केले.