सातारा : घरकामगारांना ‘कामगार’ म्हणून मान्यता मिळण्यासह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सकाळी दहा वाजता राजवाडा येथून मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाभरातून सातशेहून अधिक घरकामगार मोर्चास आले होते. मोती चौक, शनिवार चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाकामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. घरकामगारांना ‘कामगार’ म्हणून मान्यता, तालुका व जिल्हास्तरावर नोंदणीची व्यवस्था, त्यासाठी पुरेसा वर्ग व कर्मचारी, घरकामगारांसाठी अंदाजपत्रकात तरतूद, त्यांना विविध योजनांचा लाभ, कामगार कल्याण मंडळावर व जिल्हा समितीवर भारतीय मजदूर संघाला प्रतिनिधीत्व, घरकामगारांच्या नोंदणीची वयोमर्यादा ७५ करणे, साठाव्या वर्षापासून दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन, घरकामगारांच्या रद्द केलेल्या नोंदणीचे नूतनीकरण, मोफत घरे, अंत्योदय योजनेत प्राधान्य, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकामगारांनी निदर्शने केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रश्न तातडीने न सुटल्यास संघटना राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला. मोर्चात तारका शाळीग्राम, विकास खाडे, शामराव गोळे, डी. जी. देशपांडे, रवी माने, प्रमिला वैले, संगीता नारकर यांच्यासह शेकडो महिलांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
त्यांना आधी ‘कामगार’ म्हणा!
By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST