कऱ्हाड : ऊसदरासाठी बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जमावाने कऱ्हाड तालुक्यातील मालखेडजवळ महामार्गावर गनिमी काव्याने रास्ता रोको आंदोलन केले. टायर व लाकडी ओंडके पेटवून महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक रात्री सुमारे साडेनऊ वाजेपर्यंत ठप्प होती. अचानक झालेल्या या आंदोलनानंतर कऱ्हाडात जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरा पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. या ठिणगीमुळे ऊसदराचे आंदोलन भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला तरी ऊसदराचा तिढा सुटलेला नाही. दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनस्तरावर चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, ‘एफआरपी’सह प्रतिटन साडेतीन हजार रुपये अंतिम दर मिळावा, अशी मागणी करीत गुरुवारी बळिराजा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी दुपारपासून आंदोलन सुरू केले. सायंकाळी संघटनेचे कार्यकर्ते तालुक्यातील मालखेडजवळ महामार्गावर जमले. जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी महामार्ग रोखला. जमाव आक्रमक झाल्याचे निदर्शनास येताच या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील कर्मचाऱ्यांसह मालखेडला रवाना झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच जमावाने महामार्गावर टायर, गवत व लाकडी ओंडके पेटवून दिले. यामुळे अनेक वाहनचालक आपली वाहने तेथेच सोडून सुरक्षित ठिकाणी पळाले. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील पेटते टायर, लाकडी ओंडके व गवत हटविण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)राज्यमार्गांवरही गस्त कऱ्हाड शहरसह तालुका, तळबीड, उंब्रज पोलीस ठाण्यांतील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने महामार्गावर गस्त वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गासह कऱ्हाड-तासगाव राज्यमार्ग, कऱ्हाड-पाटण राज्यमार्ग, कऱ्हाड -ढेबेवाडी मार्ग, कऱ्हाड- मसूर मार्गासह तालुक्यातील सर्व प्रमुख मार्गावर गस्त सुरू करण्यात आली आहे. चालू साखरेच्या दराप्रमाणे एकरकमी ‘एफआरपी’ देणे शक्य असताना राज्य शासन कारखानदारांना पाठीशी घालत आहे. उसाचे उत्पादन घटल्यामुळे साखरेचे दर भविष्यात वाढणार आहेत. परिणामी, साडेतीन हजार दर देणे शक्य होणार आहे; मात्र सरकार व कारखानदार ‘एफआरपी’वर थांबल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी ‘एफआरपी’ची अट काढून उत्पादनखर्चावर आधारित साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. तसे न झाल्यास संघटना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.- पंजाबराव पाटील,केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा संघटनाचालू साखरेच्या दराप्रमाणे एकरकमी ‘एफआरपी’ देणे शक्य असताना राज्य शासन कारखानदारांना पाठीशी घालत आहे. उसाचे उत्पादन घटल्यामुळे साखरेचे दर भविष्यात वाढणार आहेत. परिणामी, साडेतीन हजार दर देणे शक्य होणार आहे; मात्र सरकार व कारखानदार ‘एफआरपी’वर थांबल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी ‘एफआरपी’ची अट काढून उत्पादनखर्चावर आधारित साडेतीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. तसे न झाल्यास संघटना राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.- पंजाबराव पाटील,केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा संघटना
ऊसदरासाठी महामार्गावर जाळपोळ!
By admin | Updated: November 27, 2015 00:43 IST