लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रभागरचनेची कच्ची यादी व प्रगणक गटांच्या अचूक तपशीलांसह पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी पालिका व नगरपंचायतींची सज्ज राहावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.
राज्यातील १५९ नगरपालिका आणि नगरपंचायतींचा कालावधी येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुटसुटीत टप्प्यात आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन तयारीला लागले आहे. वॉर्डरचनेच्या कच्च्या याद्या तयार ठेवण्याचा अध्यादेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगाचे निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील २४० सनदी अधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी सहभाग नोंदविला. सणस यांनी वॉर्ड रचना, प्रगणक गट आणि लोकसंख्या, हद्दवाढ असल्यास त्याचे प्रमाणित नकाशे सज्ज ठेवण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली.
ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यास त्यानंतरची निवडणूक प्रक्रिया ही जलद पद्धतीने राबवावी लागणार आहे. प्रभागरचना, वॉर्ड आरक्षण, अंतिम मतदारयादी, तत्पूर्वी हरकती सुनावणी व आरक्षण हे महत्त्वपूर्ण टप्पे सुलभतेने पार पाडावयाचे आहेत. त्या प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर सज्ज राहावे, असे आदेशही सणस यांनी दिले. अर्ध्या तासांच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.