सातारा : ‘महामार्गावरील बोगद्याच्या कामांमधून निघणारा मुरूम, खडी यांची संबंधित ठेकेदारांकडून परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. जिल्हा प्रशासनाचे यावर नियंत्रण राहिलेले नाही. एका बाजूला धनदांडग्यांना रान मोकळे सोडले आहे; तर गोरगरीब, वडार समाज, ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना खाणीतून दगड उपसा करण्याला परवानगी दिली जात नाही, हा विरोधाभास आहे. प्रशासनाकडून एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देण्याचा प्रकार चालू असल्याचे सांगून वडार समाजाला खाणीतून दगड काढण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावरही उदयनराजेंनी कोरडे ओढले. महामार्गाचे काम रिलायन्सने घेतलेली आहे. मात्र, या कामाचे चार-चार तुकडे करण्यात आले आहेत. ज्या लोकांकडे पुरेशी यंत्रणा नाही, अशा लोकांना अशी कामे दिलेली आहेत. त्यांची दुर्दशा पाहून अत्यंत वाईट वाटतं. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी काय झोपले होते का? त्यांच्या नियंत्रणाखाली या रस्त्याचे काम सुरू राहायला हवे होते. खंबाटकी बोगद्याच्या पुढे एस वळणावर अनेकांना जीव गमवावा लागला. माझ्या जिवलग मित्रांचा मृत्यू झाला. अनेकदा याबाबत नेहमीच महामार्ग प्राधिकरणाला सांगून काही फरक पडत नाही. पुणे-सोलापूर रस्ता अतिशय सुंदर आहे, त्याचे पैसेदेखील वळते झालेले आहेत. सातारा-पुणे रस्त्यावरही वसुलीतून रिलायन्सने कधीच पैसे काढून घेतलेले आहेत. मात्र, तरीदेखील टोलची वसुली सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि एनएचएआय या दोघांनी संयुक्तपणे याची जबाबदारी घ्यावी.