खंडाळा : खंडाळा शहराचा आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. तर तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत असताना शहराचे विस्तारीकरण होवू लागले असलेतरी विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून खंडाळा शहरात नेहमीच गजबज दिसून येते. खंडाळ्याला ऐतिहासिक आणि राजकीय वारसा तर आहेच; पण त्याचबरोबर खंबाटकीचा विलोभनीय सहवास आणि शिवकालीन घटनांचा स्पर्श, यामुळे खंडाळ्याचे वेगळे महत्त्व आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून दिवसेंदिवस खंडाळ्याचा विस्तार वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र घडलेला बदल, कामगारांची वाढलेली संख्या, यामुळे लोकसंख्येत आपोपच वाढ झाली आहे. खंडाळ्याची ग्रामपंचायत संपूर्ण शहराचा प्रशासकीय कारभार यशस्वीपणे सांभाळत आहे. मात्र शहराच्या विकासासाठी आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. युती शासन नव्याने सत्तेवर आल्यापासून लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याची घोषणा करण्यात आली. त्यावर प्रशासकीय अंमलही सुरू झाला आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण म्हणून खंडाळ्याची घोषणा होणे लोकांना अपेक्षित आहे. राज्य पातळीवर याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू असल्याने खंडाळ्यातील जनतेच्या नजरा नगरपंचायतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यामुळे शहराचा साचेबद्ध विकास करणे शक्य होणार आहे. पुणे शहरापासून काही अंतरावरच असल्याने पुण्याचे नागरिक शिरवळ, खंडाळ्याकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) गावातल्या इच्छुकांची आतापासूनच तयारी..खंडाळ्यात गेल्या पाच वर्षांत लोकांच्या राहण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. औद्योगिकीकरणाने कामगार विसावलेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट सिस्टीम वाढवलेली आहे. साहजिकच शहराचेच विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नगरपंचायत झाल्यास सर्वच भागाचा समतोल विकास करणे सहज, सोपे जाणार आहे. यासाठी राजकीय पदाधिकारीही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, अशांनी नगरपंचायतीसाठी आत्ताच तयारीला सुरुवात केली आहे.
लोणंदनंतर खंडाळ्याला नगरपंचायतीचे वेध
By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST