नितीन काळेल सातारा : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, आता २०१७मधील निवडणुकीतील प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही होणार आहे. यामुळे निवडणूक पूर्वीच्याच गट आणि गण रचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे ६५ गट आणि जिल्ह्यातील १३० गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षणही पडणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मागील महिन्यात न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देऊन चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश दिला होता. त्यानुसार राज्य शासनाच्यावतीने निवडणुका घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये होणार आहे.यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढून गट आणि गण रचनेविषयी सूचना केली आहे. सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गटांमध्ये निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० गण राहणार आहेत. यासाठी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे. यासाठी वेळ लागणार आहे.आरक्षण पुन्हा पडणार; गट-गणात बदल होणारमुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना गट आणि गणांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गण झाले होते. याचे आरक्षणही जाहीर झालेले. पण, आता २०२२ची रचना असणार नाही. त्यामुळे आरक्षण पुन्हा पडणार आहे. तसेच गट आणि गणातही अदलाबदल होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार
By नितीन काळेल | Updated: June 13, 2025 19:25 IST