सातारा : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २१ हजार क्युसेक आवक होत असल्याने चोवीस तासात अडीच टीएमसीने साठा वाढला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत धरणात ४०.९४ टीएमसी पाणीसाठा झाला. कोयना धरणात दि. २३ रोजी ३८.३३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्याच्या संततधार पश्चिम भागात धुवाधार पाऊस सुरू आहे. कण्हेर आणि उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस व धरणामध्ये पाण्याची आवक होत आहे. यामुळे कण्हेर धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता सांडव्यावरील विसर्गात १००० क्युसेकने विसर्गात वाढ करून वेण्णा नदी पात्रात ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वेण्णा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.त्याचप्रमाणे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस सुरूच असल्याने व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता, उरमोडी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ पासून जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदीपात्रात पाचशे क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.
वेण्णा नदीवरील पुलांवरून पाणी जाण्याची शक्यताकण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे या नदीवरील पुलावर असलेल्या हामदाबाज-किडगाव आणि करंजे-म्हसवे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. गावांचा संंपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना या पुलाऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात १६.१ पाऊसजिल्ह्यात पावसाचा मंगळवारी जिल्ह्यात संततधार सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.१ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. सातारा १२.७, जावली ४६.६, पाटण २७.३, कऱ्हाड १०.४, कोरेगाव ७.४, खटाव २.७, माण १.४, फलटण ०.७, खंडाळा ५.७, वाई १७.२, महाबळेश्वर ९५.८ असा पाऊस झाला.