सांगली : जिल्ह्यातील १ एप्रिल २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या कालावधित ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील चार हजार ९१४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापैकी ७८ गावांमधील ६५३ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले असून, त्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. दूषित पाण्याबाबत महिन्यात उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दूषित पाण्याबाबत प्रत्येक गावामध्ये जागृती केली जात आहे. तसेच गावांना दूषित पाणी पुरवठा होत आहे का? याचा शोध घेण्यासाठी पाणी स्त्रोताचे नमुने घेतले जात आहेत. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने वर्षभरात चार हजार ९१४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये ७८ गावांमधील ६५३ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे या सर्व ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील आटपाडी, दिघंची, खरसुंडी, करगणी, गोमेवाडीसह १७ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना सध्या पिवळे कार्ड दिले असून, सुधारणा न झाल्यास त्यांना रेड कार्ड देण्यात येणार आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव, कोरेगाव, शिरटे, जत तालुक्यात उटगी, मेंढीगिरी, कोळगिरी, कडेगाव तालुक्यातील सोहली, कडेगाव, रायबाग, आमरापूर, वांगी आदी १४ गावे, मिरज तालुक्यातील लिंगनूर, कवलापूर, सांबारवाडी, काकडवाडी, शिराळा तालुक्यातील कणदूर, सोनवडे, तासगाव तालुक्यातील कुमठे, उपळावे, सावळज आदी दहा गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, आरेवाडी, नागज, बोरगावमध्ये दूषित पाणी आढळले आहे. येथील ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले असून, त्यांना दूषित पाण्याबाबत उपयायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ६२६ ठिकाणचे पाण्याचे नमुने चांगले आढळले असून तेथील गावांना हिरवे कार्ड दिले आहे. जिल्ह्यातील १८ गावांमधील पाण्याचे नमुने तीव्र जोखमीचे आढळून आले आहेत. येथील ग्रामपंचायतींनी दूषित पाण्याबाबत दक्षता न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातील साडेसहाशे ठिकाणचे पाणी दूषित
By admin | Updated: June 1, 2014 01:14 IST