रत्नागिरीत समुद्राच्या खाडीत बुडून मिरजेतील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:29 AM2021-01-19T04:29:13+5:302021-01-19T04:29:13+5:30
राहिला नदीम बारगीर (वय ३५), जबीन महम्मद हनीफ जमखंडीकर (वय ५०) व शायान यासिन शेख (वय ८, रा. किल्ला ...
राहिला नदीम बारगीर (वय ३५), जबीन महम्मद हनीफ जमखंडीकर (वय ५०) व शायान यासिन शेख (वय ८, रा. किल्ला भाग, मिरज) अशी मृतांची नावे आहेत. आहिल मिलाद बारगीर (वय ३) शमशाद बारगीर (वय ५०, रा. मिरज) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
रविवारी रत्नागिरीतील नातेवाइकाच्या लग्नासाठी हे सर्व जण साखरतर म्हामूरवाडी येथे आले होते. रविवारी लग्नाच्या कार्यक्रमानंतर सोमवारी रात्री सर्व नातेवाइकांना भोजनाचा कार्यक्रम होता. मोकळ्या वेळेत मृत राहिला हिचा पती नदीम बारगीर व त्याच्यासोबत असलेल्या इतर १० जणांनी म्हामूरवाडी खाडीत फेरफटका मारण्याचा बेत आखला. नातेवाइकाच्या होडीतून सर्व जण खाडीत फिरण्यासाठी गेले. नदीम बारगीर हा होडी चालवत होता. खाडीच्या मध्यभागी आल्यावर एका मोठ्या लाटेमुळे होडीचे संतुलन बिघडून हाेडी पाण्यात उलटल़ी. या वेळी नदीम व त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने होडीतून समुद्रात पडलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र १० जणांना वाचवणे त्यांना शक्य झाले नाही. या वेळी नदीम यांनी उलटलेल्या होडीवर मुलांना बसवून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. मात्र पाण्यात बुडालेल्या दोन महिला व एका मुलास वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारीच जमखंडीकर व बारगीर यांचे नातेवाइक मिरजेतून रत्नागिरीला रवाना झाले. दोन महिलांसह बालकाच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत होती.
फाेटाे : १८ राहिला बारगीर
फाेटाे : १८ जबीन जमखंडीकर