अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -ओसाड आणि उजाड माळरान, उद्विग्न शेतकरी, सर्वांगीण विकासाला बसलेली खीळ, थकबाकी आणि वसुलीच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकीय हिशेबात अडकलेली म्हैसाळ योजना, राजकीय पाटात मुरत असलेले म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी, आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी, अर्ध्यावर अडकलेली विकासाची कामे, वीज आणि आरोग्याचे वाढते प्रश्न... अशा विविध प्रश्नांच्या चक्रव्यूहात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ सापडला आहे. वर्षानुवर्षे कवठेमहांकाळ तालुका दुष्काळाच्या आगीत होरपळत होता. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विठ्ठलदाजी पाटील यांना सोबत घेत म्हैसाळ योजना जन्मास घातली. या योजनेस नानासाहेब सगरे, शिवाजीराव शेंडगे, अजितराव घोरपडे, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उभारी दिली. आर. आर. पाटील यांनी दुष्काळी शिवाराचे नंदनवन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने कायमस्वरूपी तहान भागविली. अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे नेली. हजारो कोटींचा निधी या योजनेसाठी आणला. शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी व वीजबिल आघाडी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतूनच भरले, परंतु, १६ फेबु्रवारीला झालेल्या आर. आर. पाटील आबांच्या अकाली निधनाने दुष्काळी टापूच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे. या भागात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, सिंचन योजनेची अपूर्ण कामे अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मतदारसंघाला आबांच्या विचाराचे नेतृत्व मिळेलही, परंतु या नेतृत्वाला राजकारणाची व समाजकारणाची मर्यादा असेल. आबांसारखा राजकारणातील मोठा पल्ला गाठण्यासाठी खूप वर्षे लोटतील. तोपर्यंत हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर खूप मागे पडलेला असेल, असे जाणकार सांगतात. राज्यपातळीवरील विकासवादी नेतृत्वाची उणीव या मतदारसंघाला जाणवू लागली आहे.मतदारसंघातील राष्ट्रवादीसह आबांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची मने खचलेली आहेत. या कार्यकर्त्यांना व नेत्यांना धीर व आधार देण्याचा, बळ देण्याचा प्रश्नही राष्ट्रवादी पक्षापुढे निर्माण झाला आहे.आबांच्या जाण्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहेत. शिवाय पाणी, रस्त्यांचा प्रश्न, आरोग्याचे व विजेचे प्रश्न, प्रशासकीय पातळीवर कामात होणारी ससेहोलपट अशा अनेक समस्यांच्या गर्तेत, चक्रव्यूहात मतदारसंघ तसेच कवठेमहांकाळ तालुका अडकला आहे. या प्रश्नांचा चक्रव्यूह सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला संघर्ष तर करावा लागणार आहेच, शिवाय मतदारसंघाची प्रगती होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही पणाला लावावी लागणार आहे.मतदारसंघात राष्ट्रवादीला मरगळआबांचा राजकीय दबदबा असल्यामुळे प्रशासकीय पातळीवरील अनेक कामे लिलया केली जात होती. परंतु, आता हा प्रशासनावरील दबदबाही नाहीसा झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रशासकीय पातळीवरील कामे रखडली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तालुकास्तरावरील शासकीय कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही तालुका पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे मतदारसंघात पक्षाला व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आलेली मरगळ झटकून देऊन कामास लावण्याचे आव्हान राष्ट्रवादीतील नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. आबांनी मतदारसंघात मंजूर केलेली प्रशासकीय इमारत, रस्ते, सिंचन योजनेची व विजेची कामे, ढालगाव भागासाठी सुरू करण्यास सांगितलेली टेंभू योजनेची कामे अशी अनेक कामे मतदारसंघात धिम्या गतीने सुरू आहेत, रखडलेली आहेत. ती तातडीने पूर्ण करणेही आवश्यक आहे.
समस्यांच्या चक्रव्यूहात तासगाव-कवठेमहांकाळ
By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST