सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील विक्रमी मतांनी विजयी झाल्यापासून गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते समर्थकांमार्फत तासगाव तालुक्यात दडपशाहीची कृत्ये करीत आहेत. येत्या आठ दिवसांत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी मांजर्डे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक निकालानंतर हणमंतराव देसाई व त्यांच्या समर्थकांनी संजयकाका पाटील यांच्या अभिनंदनाचे लावण्यात आलेले फलक फाडून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तरीही तासगाव पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तासगावमध्ये संजयकाकांची मिरवणूक सुरू असताना गृहमंत्री पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मांजर्डेत हनुमान मंदिरासमोर पुन्हा दोन फलक फाडण्यात आले. यावरही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. मतदानादिवशी गृहमंत्र्यांचे समर्थक अमोल शिंदे, नगरसेवक जाफर मुजावर यांनी मतदान केंद्रात जाऊन गुंडगिरी केली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तासगावमधून शिंदे यांनी दुचाकीवरून तलवारी घेऊन दहशत माजविली होती. गृहमंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. निवेदनावर अॅड. स्वप्निल पाटील, सिद्धेश्वर माने, हणमंत पाटील, अविनाश पाटील, अॅड. सचिन गुजर, माणिकराव जाधव, शरद मानकर, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सिकंदर मुल्ला, राजू म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
गृहमंत्र्यांसह समर्थकांवर कारवाई करा
By admin | Updated: May 27, 2014 01:20 IST