अविनाश कोळीसांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून कोणतीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीचा कट ऑफ किती राहील, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. यंदाच्या निकालात पाचशेहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ५९ हजार ५०३ इतकी आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे चित्र मागील वर्षीपेक्षा प्रचंड भिन्न राहील.यंदा तुलनेने गेल्या कित्येक वर्षात सर्वाधिक कठीण पेपर आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कमी गुणांमुळे आपल्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल की नाही, याची भीती विद्यार्थी आणि पालकांना वाटत होती. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक कमी गुण असूनही चांगली आली आहे.यावर्षी पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यालाच ६८६ गुण मिळाले आहेत. यावर्षी ५००हून अधिक गुण मिळवणारे देशभरात फक्त ५९ हजार ५०३ विद्यार्थी असल्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेशाचा कटऑफ मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुणनिहाय विद्यार्थी संख्यागुण - विद्यार्थी१४४-२०० - ३,०३,०४०२०१-२५० - १,९८,३४६२५१-३०० - १५७,९५२३०१-३५० - १,२६,९३५३५१-४०० - १,०५,५७८४०१-४५० - ८८,२३९४५१-५०० - ६९,५०३५०१-५५० - ३९,५२१५५१-६०० - १०,६५८६०१-६५० - १२५९६५१-६८६ - ७३
गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक चांगली आली असल्यामुळे ऑल इंडिया कौन्सिलिंगचा कट ऑफ कमी येणार आहे. महाराष्ट्रातील प्रवेशासाठी महाराष्ट्रातील गुणवत्ता यादीतील क्रमांक (स्टेट मेरिट लिस्ट) आणि महाराष्ट्रातील कॅटेगरी क्रमांक किती आहे, हे महत्त्वाचे आहे. तरीही गतवर्षीपेक्षा खूप कमी गुणांना महाराष्ट्रात प्रवेश मिळण्याची संधी आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली