बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीचे ६ लाख २० हजारांचे वीजबिल थकीत असून, वीज जोडणी तोडण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर आली आहे. तरीही नूतन सरपंच व उपसरपंच सत्कार समारंभात व्यस्त आहेत.
मसुचीवाडी गाव हे गुरू-शिष्याच्या टोकाच्या राजकीय संघर्षाने अवघ्या जिल्हाला परिचित आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावच्या विकासासाठी सर्व बाजूला ठेवून हे दोन नेते एकत्र आले; परंतु अद्याप हे नेते पंचायतीकडे फिरकलेच नाहीत. निवडणूक होऊन एक महिना उलटला तरीही नूतन सदस्यांची बैठक झालेली नाही की समित्यांची स्थापना केलेली नाही.
पंचायतीत कार्यकारिणीचा साधा फलकही नाही. गावात गटारगंगा रस्त्यावर वाहात आहे, पाणी योजनेचेही तीनतेरा वाजले आहेत. ग्रामपंचायतीचे सहा लाख २० हजारांचे वीजबिल थकले आहे. यामुळे वीज जोडणी तोडण्याची नामुष्की आली; तरीही कोणाचेच डोळे उघडत नाहीत. मार्च उजाडला तरी ग्रामपंचायतीची वसुली कागदावरच दिसत आहे. वसुलीसाठी ना ग्रामसेवक वेळ देत आहेत ना सदस्य ना कर्मचारी, मग पंचायतीचा कर वसूल कसा होणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील आरोग्य, शिक्षण, रस्त्याच्या समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. नेते मात्र सत्कार समारंभातच अजून गुंग आहेत. त्यांनी हार-तुरे बाजूला ठेवून गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोट
सहा लाखांची थकबाकी ही तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींच्या तुलनेत कमीच आहे. वीज जोडणी तोडणार नाही तर फक्त कल्पना देण्यासाठीच वीज कर्मचारी चकरा मारत आहे. वसुली झाली की वीजबिल भरणार आहे. समिती निवडीसाठी ४५ दिवसांचा कालावधी असतो, तो अजून संपलेला नाही. त्यापूर्वी चार समित्या नेमणार आहे.
- शांताराम कदम, उपसरपंच, मसुचीवाडी