सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता तोंडावर असल्याने जुळवाजुळव सुरू झाली आहे. १९ जागांसाठी जवळपास दोनशेहून अधिक इच्छुकांचे नेत्यांकडे आता हेलपाटे सुरू झाले आहेत. या निवडणुकीतही जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच फॉर्म्युला असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना राष्ट्रवादीच्या गटात आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे पतंगराव कदम-विशाल पाटील गटाविरुध्द जयंत पाटील, मदन पाटील व विलासराव जगताप एकत्र येण्याचे संकेत आहेत. याद्या जाहीर झाल्याने सर्वच नेत्यांनी बाजार समितीसाठी शड्डू ठोकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात आहे. सर्वाधिक इच्छुकांची गर्दी जत तालुक्यात असून, येथून ६० हून अधिकजण इच्छुक आहेत. आ. जयंत पाटील यांनी नुकतीच जत तालुक्यात बैठक घेतली. यावेळी अनेक इच्छुकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी नेतेमंडळीही उपस्थित होती. सांगली बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले होते. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण, अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. यावेळी मात्र चित्र बदलण्याची शक्यता आहे. पतंगराव कदम, विशाल पाटील एकत्र आले आहेत. गतवेळी कदम गटाची साथ जयंतरावांना होती. आता मात्र मदन पाटील व जयंत पाटील एकत्रित आल्याने पतंगराव कदम, विशाल पाटील असे विरोधात आले आहेत. त्यामुळे नेत्यांचे समर्थक उमेदवारीसाठी नेत्यांकडे हेलपाटे मारत आहेत. (प्रतिनिधी)१९ पैकी १५ जागांसाठीच चुरस समितीसाठी १९ जागांसाठी निवडणूक होत असली तरी, प्रत्यक्षात १५ जागांसाठीच चुरस आहे. यामध्ये सहकारी सोसायटीच्या ११ व ग्रामपंचायतीच्या चार जागांचा समावेश आहे. प्रक्रिया संस्था १, हमाल मापाडी १ व व्यापारी प्रतिनिधींसाठी दोन जागांचा समावेश आहे. बाजार समितीची निवडणूक पाच गटामध्ये होते. त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदारसंघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदारसंघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदारसंघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. अंतिम मतदार याद्या जाहीरसमितीची अंतिम मतदार यादी गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली. मतदारांची संख्या ८ हजार २२० आहे. सहकार संस्था व ग्रामपंचायतीचे सदस्य नसल्यामुळे गत काळातील पाच संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये माजी सभापती वैभव पाटील, संजय सावंत, विश्वास कोळेकर, जगदेव माळकोटगी व संगीता नलवडे यांचा समावेश आहे. अंतिम यादी अशी- सहकारी संस्था - २६६८, ग्रामपंचायत मतदार - २२८५, व्यापारी मतदार - १३२४, हमाल तोलाईदार १५९१, प्रक्रिया मतदार ३८२. प्रक्रिया मतदार संख्या ७ ने वाढली असून, हमाल तोलाईदारमध्ये ११ मतदार वाढले आहेत. व्यापारी मतदारांची संख्या ११ ने, तर ग्रामपंचायतीचा १ मतदार घटला आहे.निवडणूक कार्यक्रम १0 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक जुलैच्या अंतिम आठवड्यात किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
बाजार समितीकरिता जिल्ह्यातील नेत्यांचा शड्डू
By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST