मिरज : मिरजेत आरपीआय आठवले गटाच्या मेळाव्यात महापालिका निवडणुकीसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रिपाईं स्वबळावर लढविणार असल्याचे प्रदेश सचिव विवेक कांबळे यांनी सांगितले.
विवेक कांबळे म्हणाले की, मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक अडचणींवर मात करून आज आरपीआयने आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभा निवडणूक आरपीआय स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रिपाईं कार्यकर्त्यानी आतापासूनच कामाला लागा, असा संदेश विवेक कांबळे यांनी दिला.
बहुजन बहुसंंख्य असूनही राजकीय क्षेत्रात आपल्या विचारसारणीचे उमेदवार निवडून आणणे कठीण होत आहे. या परिस्थितीबाबत चिंतनाची गरज असल्याचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रिपाईंचे पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या वेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष नगरसेवक लालासाहेब वाघमारे, कोल्हापूर जिल्हानेते सतीश माळगे, सतीश जाधव, संदेश भंडारे, छाया सर्वदे, अशोक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. अरविंद कांबळे व अविनाश कांबळे यांनी स्वागत केले.
सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बापू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष रवी खांडेकर, सांगली शहराध्यक्ष सुनील साबळे व माणिक गस्ते, मिरज शहर उपाध्यक्ष सुमीत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. हेमंत चौगुले, पलूस महिला तालुकाध्यक्ष रुपाली कांबळे यांना निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी यशवंत कांबळे, प्रवीण धेंडे, संजय कांबळे, पिंटू माने, दादासाहेब चंदनशिवे, विलास कांबळे, संजय मस्के, क्रांतिकुमार कांबळे, विशाल तिरमारे, सलमान पठाण, मनोज गाडे उपस्थित होते.
अभिजित आठवले यांनी प्रास्तविक केले. या वेळी जिल्हा कार्यकारिणीची फेरनिवड करण्यांत आली. अभिजित आठवले यांनी प्रास्तविक केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.