क्रांतिसिंहांच्या स्मारकाची आताच आठवण का?
By Admin | Updated: June 17, 2016 00:29 IST2016-06-16T23:12:30+5:302016-06-17T00:29:38+5:30
जयंतरावांना आव्हान : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्टंटबाजीची चर्चा

क्रांतिसिंहांच्या स्मारकाची आताच आठवण का?
ंअशोक पाटील -- इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील चिकुर्डेचे अभिजित पाटील शिवसेनेत सामील झाल्याने त्यांना आता ‘मातोश्री’वर ताकद दाखवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचा प्रश्न हाती घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही स्टंटबाजी सुरू असल्याची चर्चा तालुक्यातून आहे.
अभिजित पाटील एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादीला धूळ चारली होती. परंतु मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा दारुण पराभव केला. हा पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला. सांगली जिल्ह्यात काँगे्रस, तर कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांचे नेतृत्व मानून त्यांनी राजकारण केले. कालांतराने काँग्रेसमध्ये काहीही भवितव्य नाही असे लक्षात आल्यानंतर, ऐन लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. या प्रचाराचा प्रारंभ येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या अभिवादनाने करण्यात आला. त्यावेळी कोणालाही क्रांतिसिंहांच्या स्मारकाच्या दुरवस्थेची अथवा तेथे वीज नसल्याची आठवण झाली नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व मानून आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर ते अज्ञातवासात होते.
वाळवा-शिराळा तालुक्यात शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या माध्यमातून इस्लामपूर नगरपालिकेत खाते उघडले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून क्रांतिसिंहांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून थेट आमदार जयंत पाटील यांना आव्हान देऊन स्टंटबाजी चालवली आहे, असे बोलले जात आहे.
कोण, काय म्हणाले?
क्रांतिसिंह नाना पाटील वाळवा तालुक्याचे भूषण आहेत. त्यांच्या स्मारकाची अवस्था दयनीय आहे. स्मारकातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टकडे आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे. पी. आर. पाटील यांचा यात काहीही संबंध नाही.
- अभिजित पाटील, शिवसेना नेते.
राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले जाते. येडेमच्छिंद्र स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. याचा अर्थ बांधकाम थकीत बिल ट्रस्टने भरावे, असा नाही. सध्या भाजप, शिवसेनेचे सरकार आहे. बिल अभिजित पाटील यांनी भरून विजेचा प्रश्न मार्गी लावावा.
पी. आर. पाटील,
अध्यक्ष, राजारामबापू कारखाना.