तासगाव : ‘मोरयाऽ मोरयाऽऽ’चा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, सकाळपासून सुरू असलेला पाऊस, त्यात चिंब भिजलेल्या भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेले... अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २३५वा रथोत्सव आज, शनिवारी पार पडला. त्यानंतर रात्री उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. येथील श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या या रथोत्सवास २३४ वर्षे पूर्ण झाली. सध्या त्यांची नववी पिढी कार्यरत आहे. त्यातील श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व श्रीमंत निरंजन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला. काल, शुक्रवार गणरायाच्या आगमनापासून पावसाची संततधार सुरू होती. आज, शनिवार सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे भरपावसात रथोत्सव होणार का, याबाबत सर्वत्र चर्चा होती. मात्र, दुपारी साडेबारानंतर पावसाचा जोर ओसरला. दुपारी एकच्या दरम्यान पावसाने पूर्ण उघडीप दिली. प्रत्यक्ष रथ ओढण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून सायंकाळपर्यंत पावसाची उघडीप होती. त्यामुळे रथोत्सवात अडचण आली नाही.दुपारी एकच्या सुमारास पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूंची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी रथापुढे असणाऱ्या गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’ची घोषणा दिली.रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. रस्त्यावर सर्वत्र पाणी-पाणी झाले होते. ‘मोरयाऽ... मोरयाऽऽ’च्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी जोशात रथ ओढण्यास सुरुवात केली. काही फूट पुढे गेल्यानंतर ओंडक्याच्या साहाय्याने रथ थांबविण्यात येत होता. काही वेळ विश्रांती व पुन्हा ‘मोरयाऽऽ’चा गजर करीत भाविकांनी श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर गाठले. रथापुढे हत्ती, बैलगाडी, सनई-चौघडे होते. झांजपथकातील विविध खेळ यावेळी सादर करण्यात आले.केळीचे खुंट, नारळांची तोरणे, पताका, फुलांच्या माळा, आदींनी रथ सजविण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या नागरिकांनी रथमार्गावर रांगोळी काढून रथाचे स्वागत केले. गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान रथाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात येतो. श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्रांची भेट होते व रथ परतीच्या प्रवासाला लागतो. त्याप्रमाणे श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळांचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गणेशमंदिरात भक्तांना दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रथयात्रेच्या मार्गावर तसेच गुरुवार पेठ, बसस्थानक चौकापर्यंतच्या रस्त्यावर यात्रा भरली होती. सर्वत्र प्रसादाचे, नारळांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळण्यांचेही स्टॉल्स होते. रथयात्रेनंतर गणपती मंदिरात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांनी सर्व मानकऱ्यांना मानाचे श्रीफळ दिले. रात्री उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. (वार्ताहर)
भरपावसात तासगावचा रथोत्सव
By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST