सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी रसद पुरविल्यामुळे पक्षातील अन्य नेत्यांनी त्याचे राजकीय भांडवल केले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करून शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांना हटविण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे, तर दुसरीकडे दिनकर पाटील यांनी त्यांच्याविरोधात कुरघोड्या करणार्यांना, मी राजीनामा उद्या देतो, तुमची हिंमत असेल तर शहर जिल्हाध्यक्ष व्हा, असे आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे पक्षातील संघर्ष पेटल्याचे दिसत आहे.लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यावरून राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून त्यांच्यात कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे. याचे पडसाद पुणे पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार सारंग पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटले. दिनकर पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे यांच्याविरोधात टीकेचा भडीमार केला. बैठकीतील वादाविषयी दिनकर पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची काहीजणांना स्वप्ने पडू लागली आहेत. यातूनच ते माझ्याविरोधात छुप्या पध्दतीचे राजकारण करीत आहेत. अशा कुरघोड्या करण्याऐवजी त्यांना शहर जिल्हाध्यक्षच व्हायचे असेल, तर त्यांनी खुशाल व्हावे. मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पक्षाने कोणतीही कारवाई केली, तर त्याचा मी स्वीकार करेन. पण, ज्यांना काहीच जनाधार नाही, अशांच्या कुरघोड्यांचे राजकारण खपवून घेणार नाही. अद्यापि पक्षाने कोणतीही कारवाई केली नसून ती करण्यासही ते तयार नाहीत. जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनीही भाजपचा प्रचार केला होता. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी पक्षातील एक गट कार्यरत होता. जगतापांवर कारवाई झाली, मात्र घोरपडे यांच्यावर करण्याचे धाडस वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेले नाही. मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत असून याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी नेत्यांमधील राजकीय संघर्ष पेटला!
By admin | Updated: June 6, 2014 01:42 IST