सांगली: सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून अखेर भाजपाने माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काही वेळापूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख यांच्यात चर्चा झाली होती. बंद दाराआड झालेल्या या चर्चेनंतर संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याचे भाजपाकडून जाहीर करण्यात आले.ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्ममान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे शिवसेनेने विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.
अखेर पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; विश्वजीत कदमांचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 15:15 IST