विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : महसूल विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शाहुवाडी तालुक्यातील ‘मानाेली ट्रीग पॉइंट’ची सध्या दुरवस्था झाली आहे. ब्रिटिशकाळात पश्चिम महाराष्ट्रातील जमीन माेजणीची सुरुवात या ठिकाणावरून झाल्याने हे ठिकाण महसूल विभागाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू मानले जाते. येथील मुख्य झेंडा बुरुज ‘मानोली ट्रिग पॉइंट’ म्हणून ओळखला जाताे. पण सध्या येथे माेठी दुरवस्था असून, या ठिकाणाचे संवर्धन हाेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन किलाेमीटर अंतरावरील मानोली गाव पर्यटनाच्या दृष्टीनेही पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू ठरावे असे आहे. ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली. १८०० मध्ये म्हैसूरवरील विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू-भागाचे अचूक सर्वेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली. ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणाऱ्या एका आधाररेषेवरून (बेस लाइन) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे. या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रासजवळील सेंट थाॅमस माउण्ट आणि पेरूमबक्कम यातील १२ किलाेमीटर लांबीची रेषा होती. दुसरी आधाररेषा बंगळुरू येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वारन यांनी निर्धारित केली. १८०६ कोईमतूर, १८०८ तजांवर, १८०९ तिनवेल्ली, १८२२ हैदराबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली. दुसरीकडून दक्षिण-पश्चिम बाजूने ॲण्ड्यू स्कॉट यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणास ‘द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ असे नाव दिले.
ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबविण्यासाठी हे सर्वेक्षण केले असले तरी, यामुळेे संपूर्ण भारताचे मानचित्र, देशाची समृद्धता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाली. हेच या सर्वेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. १८४२ मध्ये कोकणातून सर्वेक्षण करत स्कॉट आंबा घाट पार करून आला. तेव्हा त्रिमितीय बिंदू निश्चित होईना. उदगिरी, विशाळगड, कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला. मानोली येथील त्रिमितीय बिंदूमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली. पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली.
१८४२ साली ख्रिसमस साजरा करून स्कॉट याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकावला जातो. मानोली येथील त्रिमितीय बिंदू हे वारसास्थळ आहे. येथील डोंगराच्या कड्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही भाग खचत चालला आहे त्यामुळे भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना या वारसास्थळाचे संवर्धन गरजेचे आहे.